लखनौ – भारतीय जनता पक्षाच्या उत्तरप्रदेशातील सरकारमधून बाहेर पडलेले दोन मंत्री स्वामीप्रसाद मौर्य आणि धरमसिंह सैनी यांनी आज आपल्या समर्थकांसह समाजवादी पक्षात प्रवेश केला.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पाच आमदारांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे अपना दल पक्षाचे आमदारही समाजवादी पक्षात गेले आहेत.
आजच्या या कार्यक्रमाने भाजप या राज्यातून संपली असल्याचा शंख नाद झाला आहे असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. मौर्य यांनी म्हटले आहे की मी बहुजन समाज पार्टी सोडल्यानंतर हा पक्ष संपला आता तसेच मी भाजप सोडल्यामुळे भाजपही तसाच संपुन जाणार आहे.
धरमसिंह सैनी यांनी तर आपण भाजप सोडणार असल्याच्या वृत्तात अजिबात तथ्य नाही असे स्पष्टीकरण दिल्यानंतर 24 तासांनीच भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला आहे.मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर पुढील काहीं तासांतच भाजपचे दहा आमदार आणि दोन मंत्री भाजपमधून बाहेर पडणार असल्याचे भाकित स्वत: मौर्य यांनी केले होते. हे सर्व जण ओबीसी गटांतील आहेत.त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.