नवी दिल्ली – दिल्लीतील सत्तेसाठी सर्वात महत्त्वाचं राज्य समजलं जाणाऱ्या उत्तर प्रदेशात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. ही विधानसभा निवडणूक 2024 मध्ये होणाऱ्या पुढील लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट समजली जाते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी संपूर्ण जोर लावला आहे. मात्र निवडणूक एक महिना राहिली असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जबर धक्का बसला आहे.
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीपूर्वीच योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेटमंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला आहे. मौर्य भाजप सोडून अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
मौर्य यांनी राज्यपालांकडे सोपविलेल्या राजीनाम्यात म्हटलं की, माननीय राज्यपालजी मी योगी आदित्यनाथजी यांच्या मंत्रीमंडळात श्रम आणि रोजगार तथा समन्वयमंत्री म्हणून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि विपरीत विचारधारेत काम केलं. मात्र दलित, मागासवर्गीय, शेतकरी, छोटे व्यापारी आणि मध्यमवर्गीय श्रेणीतील व्यापाऱ्यांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आपण उत्तर प्रदेशच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देत आहोत.
मौर्य पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. मागासवर्गीय समाजातील ते मोठे नेते मानले जातात. ते 80 च्या दशकापासून सक्रिय राजकारणात असून 2012 ते 2016 या कालावधीत ते उत्तर प्रदेश विधानसभेत विरोधीपक्षनेते होते. त्यांनी मुलगी संघमित्रा मौर्य बदायू मतदार संघाच्या आमदार आहेत.
दरम्यान मौर्य अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील समाजवादी पक्षात सामील होण्याची शक्यता व्यक्त कऱण्यात येत आहे. त्यामुळे मौर्य यांचा राजीनामा योगींसाठी मोठा धक्का मानला जात आहे.