मुंबई – महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे बॅंकांच्या कामकाजाचे दिवस आठवड्यात पाच असावेत. त्याचबरोबर बॅंकांमध्ये फक्त 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असावी अशी विनंती बॅंक कर्मचारी संघटनेने केली आहे.
युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन या संघटनेने राज्यस्तरीय बॅंकर्स समितीला यासंदर्भात पत्र लिहिले आहे. बॅंकांच्या कामकाजाचा वेळ कमी करून दोन वाजेपर्यंत करण्यात यावा, असा आग्रह या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचारी आणि ग्राहकांचा संबंध कमी होण्यास मदत होईल आणि संसर्ग वाढणार नाही.
बॅंक कर्मचाऱ्यांना ग्राहकांबरोबर काम करताना त्यांचा जवळचा संबंध येतो. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असते. असा प्रकार या अगोदरच्या करोनाच्या लाटेमध्ये झालेला आहे. कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस शक्य तितक्या लवकर देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.