कोलकाता – करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पश्चिम बंगालमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सोमवारपासून राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच सर्व कार्यालयांमधील कामकाज 50 टक्के उपस्थितीच्या आधारे करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव एच.के. द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेमध्ये या निर्बंदांची माहिती दिली.
या निर्बंधांच्या कालखंडात सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. स्थानिक उपनगरी लेल्वे देखील संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 50 टक्के प्रवाशांच्या क्षमतेसह सुरू राहतील. तर शॉपिंग मॉल आणि बाजार रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र निम्मीच दुकाने सुरू राहतील, असे त्यांनी सांगितले.
चित्रपटगृह आणि थिएटर देखील 50 टक्के क्षमतेने सुरू असतील. परिसंवादासाकरख्या कार्यक्रमांना केवळ 200 प्रेक्षकांची परवानगी असेल. विवाहासाठी 50 आणि अंत्यसंस्कारांसाठी 20 लोकांच्या संख्येची मर्यादा असेल.
लांब पल्ल्यांच्या रेल्वे आपल्या नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहतील. कोलकातातील मेट्रो रेल्वेदेखील आपल्या नियमित वेळापत्रकानुसार सुरू असेल. मात्र केवळ 50 टक्के प्रवासीच प्रवास करू शकतील. सर्व प्राणिसंग्रहालये, जलतरण तलाव, पार्लर, स्पा, व्यायामशाळा आणि पर्यटनस्थळे बंद राहतील.
मुंबई आणि दिल्लीवरून आठवड्यातून दोनच वेळा विमाने उतरण्याची परवानगी असेल. सध्या तरी ब्रिटनवरून कोणत्याही विमानांना राज्यात येऊ दिले जाणार नाही.