जयपूर – राजस्थानातील बारमेर जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात 11 जण ठार झाले तर अन्य 22 जण जखमी झाले आहेत. बारमेर-जोधपूर रस्त्यावर भंदियावस गावाजवळ दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला.
या वाहनांची धडक इतकी जबरदस्त होती की त्यानंतर या दोन्ही वाहनांना आग लागली, त्यात ही वाहने जळून खाक झाली. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दहा जण जागेवरच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातात जी बस सापडली आहे त्या बसमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी भरले होते. त्यामुळे मृत व जखमींची संख्या मोठी आहे.
मुख्यमंत्री गहलोत यांनी बारमेरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून जखमींवरील उपचारांच्या सोयीबद्दल माहिती घेऊन त्यांना योग्य त्या सुचना केल्या आहेत.