राहू (भाऊ ठाकूर) – राहू बेट परिसरातील काही ठराविक ग्रामसेवक हे अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. सरकारी नियमानुसार तीन वर्षे एकाच ठिकाणी काम करू शकतात. मात्र, काही ग्रामसेवक बेट परिसरातील घरजावाई असल्याप्रमाणे एकाच ठिकाणी आहेत. हे पंचायत समितीच्या प्रशासन विभागाच्या निदर्शनात येत असूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामान्य नागरिकांतून होत आहे. करोनाकाळामुळे बदल्या थांबल्या हे जरी मान्य असले तरी करोनाच्या पूर्वीपासून 5 वर्षे एकाच ठिकाणी कर्मचारी आहेत.
मागील काळात अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन नवीन व तरुण सरपंच, सदस्य निवडून आलेले आहेत. परंतु हे जुने ग्रामसेवक नवीन सदस्यांना सहकार्य न करता कोठेतरी कायद्याचा धाक दाखवून आपणाला हवे तशी कामे करून घेत आहेत. त्यामुळे विकासकामांना फटका बसला आहे. पाणीपुरवठा, औषध फवारणी आदी कामासाठी सरपंचांना व सदस्यांना पाच- पाच दिवस ग्रामसेवकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकवेळा फोन केल्यास माझ्याकडे दुसऱ्या गावाचा पदभार आहे. मी त्या गावाला आहे. मी तालुक्यात मिटिंगला आहे, असे सांगितले जात आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र हे घरीच असतात, असा अनुभव पदाधिकाऱ्यांना आल्याची चर्चा आहे.
घरातूनच कामकाज
एकाच ठिकाणी अनेक दिवस राहिल्यामुळे जास्त प्रमाणात ओळख निर्माण होऊन त्याचा कामकाजावर परिणाम होत आहे. परिणामी ग्रामसेवक हे मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता एका मध्यवर्ती ठिकाणी भाड्याने घर घेऊन राहत आहेत. तेथूनच कामकाज करीत आहेत. गावकारभारी लोकांची कामे फोनवर होत असल्यामुळे ही मंडळी सामान्य माणसाच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत.
राजकीय गटबाजीचा फायदा
राहू बेट परिसरात राजकीय गट हे तुल्यबळ आहेत. त्यामुळे ग्रामपंचयात प्रशासनावर पकड ठेवण्यासाठी सत्ताधारी तसेच विरोधक प्रयत्न करीत असतात. याचाच फायदा घेऊन अनेक तरबेज ग्रामसेवक हे दोन्ही गटातील सक्रिय कार्यकर्त्यांबरोबर आपल्या पद्धतीने संधान साधून आहेत. सामान्य व्यक्तीने जरी तक्रार केली तरी यांचे काही बिघडत नाही.
“माझ्याकडे काही तक्रारी आल्या नाहीत. मागील काळात आम्ही प्रशासकीय व विनंती बदल्या केल्या आहेत. परंतु काही विषय असतील तर त्याची दखल घेतली जाईल.”
– हेमलता फडके, सभापती, पंचायत समिती, दौंड.
“काही तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. परंतु ते बदलीच्या निकषांमध्ये बसत नसल्यामुळे होऊ शकले नाही. बदलीचा अधिकार आपल्या अधिकारात नाही. परंतु पुढील काळात पाहून योग्य प्रस्ताव पाठवून नियोजन केले जाईल.”
– अजिंक्य येळे, गटविकास अधिकारी, दौंड.