जिल्ह्यात “मिशन कवच कुंडल’अंतर्गत वाड्यावस्त्यांवर लसीकरण
सातारा – सातारा जिल्ह्यात अठरा वर्षांवरील सर्व लोकांना करोना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. यामध्ये जवळपास 23 लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण झालेले आहेत. मात्र, अजूनही काहींनी लसीकरणाकडे पाठ फिरविली आहे. आता तर केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनेनुसार आरोग्य विभागाकडून ‘मिशन कवच कुंडल’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. दि. 8 ते दि. 14 ऑक्टोबर या कालावधीत र 4 लाख 20 हजार लोकांना करोना लसीकरण करण्यात येणार आहे.
करोना महामारीत शासनाने निर्धारित केलेल्या निर्णयानुसार अठरा वर्षांवरील लाभार्थींचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मिशन कवच कुंडल मोहीम आखण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण हे सनियंत्रण अधिकारी म्हणून काम करत आहेत. जिल्हास्तरावर लसीकरण अधिकारी म्हणून डॉ. प्रमोद शिर्के तर तालुकास्तरावर नोडल अधिकारी म्हणून तहसीलदार काम पाहत आहेत.
जिल्ह्यात कराड उपजिल्हा रुग्णालय, सातारा ग्रामीण रुग्णालय आणि सातारा येथील कस्तुरबा रुग्णालयात सलक 75 तास लसीकरण मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक वाडी-वस्ती आणि गावामध्ये लसीकरण करण्याची मोहीम हाती घेवून 4.20 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ज्या लाभार्थींना लसीकरण केंद्रांवर जावून लस घेता येणे शक्य नाही, त्यांना करोना लसीकरण आपल्या दारी’ या मोहिमेतंर्गत जागेवर जावून लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व महिलांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पहिला व सर्व शिल्लक दुसरा डोस देण्याचे नियोजन करण्यात आले असून गाव, वाडी, वस्ती, वीटभट्टी, साखर कारखाने आदी कार्यस्थळावर शासकीय वाहनाने जावून प्रत्येकाला आरोग्य विभागाचे कर्मचारी लसीकरण करत आहेत.
विशेषत: 61 खासगी संस्थांना यामध्ये सहभागी करुन घेण्यात आले असून त्यांना कोविड लसीकरणाची मान्यता देण्यात आली आहे.दरम्यान, सातारा जिल्ह्यात कोरोनाचा एक डोस घेतलेल्यांचे मृत्यूचे प्रमाण 6.39 टक्के तर दोन डोस घेतलेल्यांचे मृत्यूचे प्रमाण 0.99 टक्के इतके आहे.
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करोना लसीकरण मोहीम गतीने राबविण्यात येत आहे.जिल्ह्यात पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, अजूनही काहीजण लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत. ही बाब गंभीर आहे. करोनापासून स्वत:चा बचाव करायचा असेल-तर लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे.
डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी