इंदापूर -कॉंग्रेसमध्ये असताना विधानसभेचे तिकीट मला देण्याचे पक्षाने कबूल केले होते. तसे ठरलेही होते; मात्र कॉंग्रेसने केवळ तिकीट न दिल्यामुळे भाजपमध्ये गेलो आहे व याच पक्षात समाधानी आहे, अशी स्पष्टोक्ती राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर अर्बन सहकारी बॅंकेच्या सभागृहात बुधवारी (दि. 13) कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची बिनविरोध संचालक मंडळाची बैठक झाली. यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, मयूरसिंह पाटील,
व्हाइस चेअरमन पद्माताई भोसले, बॅंकेचे माजी चेअरमन भरत शहा, चेअरमन देवराज जाधव, भाजपचे तालुका अध्यक्ष ऍड. शरद जामदार, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, नगर परिषदेचे गटनेते कैलास कदम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी शेतकरी सभासदांनी, कर्मयोगी कारखान्याच्या निवडणुकीसाठी समजूतदारपणाची भूमिका घेतली. आमच्यावर विश्वास दाखवला कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदा निवडणूक बिनविरोध झाली.
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, अप्पासाहेब जगदाळे यांनी शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका बजावली. साखर कारखानदारी चालवणे आता अडचणीचा काळ वाटत असला तरीदेखील,
केंद्र व राज्य सरकारने सहकारी साखर कारखान्यांबद्दल नवे धोरण आखण्याचे प्रयत्न यशस्वीपणे सुरू केले आहेत. त्यामुळे आगामी काळात साखर कारखान्याचा आर्थिक ताण कमी होणार आहे.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास होतोय
ज्या साखर कारखान्याच्या चौकशीसाठी छापेमारी चालली आहे, या चौकशीचा आणि माझा, माझ्या वक्तव्याचा, तसेच माझ्या भाजप प्रवेशाचा कोणताही संबंध नाही. मी भाजपमध्ये गेलो, हा माझा राजकीय निर्णय आहे.
मावळ तालुक्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात जे काही मी बोललो त्याचा विपर्यास वेगळा अर्थ काढला जातोय. मी बोलताना कुणाचाही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे कृपा करून वेगळा अर्थ काढू नका, असा खुलासा हर्षवर्धन पाटील यांनी केला.