कोल्हापूर – शिवछत्रपतींच्या गडकिल्यांची नावे असलेल्या बार वाईन शॉपची नावे बदलावी अशी मागणी शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाच्यावतीने उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे केली. या संदर्भात संघटनेच्यावतीने त्यांना कोल्हापूरात निवेदन दिले.
मंत्री देसाई आज कोल्हापूरात अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेची पाहणी करण्यास आले होते. देवीचे दर्शन आणि बंदोबस्ताची पाहणी केल्यानंतर मंत्री देसाई शासकीय विश्रामगृहावर आल्यावर त्यांना संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात असे म्हटले आहे. की छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले हे शिवप्रेमींचे प्रेरणास्थान आहेत. किल्ले लढण्यासाठी स्फुर्ती देतात. अशा पवित्र किल्ल्यांची नावे काही बार आणि वाईन शॉपला दिली आहे. अशा वाईन शॉप आणि बिअरबार, परमिट रुमना परवानगी देऊ नये असा निर्णय शासनस्तरावर व्हावा. तसेच सर्व गड किल्ल्यांवर सरकारी घोषणेनंतर दारुबंदी झाली आहे पण कोल्हपूर जिल्ह्यातील पन्हाळा गडावर बियर बार आणि देशी दारुचे दुकान आहेत. ते ताबडतोब बंद व्हावेत अशी मागणी केली.
संघटनेने अतिशय चांगला विषय मांडला आहे, असे मंत्री देसाई म्हणले. या संदर्भात लवकर निर्णय घेण्यासाठी मुंबई येथे संबधित अधिकाऱ्यांची बैठक लावण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली. संघटनेच्या शिष्टमंडळात हर्षल सुर्वे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, किरणसिंह चव्हाण, प्रदीप पांडे, विजय दरवान, अर्जुन संकपाळ, विक्रम जगताप, केतन पाटील, अमृता सावेकर, शुभम जाधव, गणेश खोचीकर, प्रिया पाटील, रोहित पानारी यांचा समावेश होता.