नवी दिल्ली – आयएसएसएफ कनिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारताने आपले वर्चस्व सिद्ध करताना तब्बल 20 पदके पटकावण्याची कामगिरी केली आहे. भारताने 9 सुवर्ण, 8 रजत तर, 3 ब्रॉंझ अशी एकूण 20 पदके मिळवली आहेत. तसेच या कामगिरीच्या जोरावर भारताने गुणतालिकेत अव्वलस्थानही मिळवले आहे.
भारताच्या अनुभवी नेमबाज मनू भाकर, रिदम सांगवान आणि नाम्या कपूर यांचा समावेश असलेल्या महिला संघाने 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. हे पदक जिंकताना भारतीय संघाने अंतिम फेरीत अमेरिकेवर 16-4 असा विजय मिळवला. या स्पर्धेत मनूचे हे विक्रमी चौथे सुवर्णपदक ठरले. तिने याच स्पर्धेत एक ब्रॉंझपदकही प्राप्त केले आहे. मनुसह नाम्या हिचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले. याआधी तिने 25 मीटर वैयक्तिक पिस्तूल प्रकारातही सुवर्णवेध घेतला होता.
25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात भारताच्या आदर्श सिंगने रजतपदक मिळवले. अंतिम फेरीत अमेरिकेच्या हेन्री टर्नर लेव्हेरेटकडून त्याचा पराभव झाला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सहा स्पर्धकांमध्ये आदर्शसह उदयवीर आणि विजयवीर सिद्धू या भारताच्या तिघांचा समावेश होता.
तसेच ट्रॅप प्रकारात भारताच्या बख्तयारुद्दीन मलीक, शार्दूल विहान आणि विवान कपूर यांनी देशाला रजत पदक मिळवून दिले. अंतिम सामन्यात भारताला इटलीकडून 4-6 असा पराभव स्वीकारावा लागला होता.