एकदा एक मुलगा आपल्या वडिलांना मोठ्या कुतूहलाने विचारतो, “बाबा “महान’ या शब्दाचा नक्की अर्थ काय आहे? मी बऱ्याच ठिकाणी वाचले, ऐकले आहे की ती व्यक्ती महान होती, तिने हे केले, तिने ते केले. पण हे लोक महान कसे होतात, मला सांगा ना?’
वडिलांनी मुलाला महान शब्दाचा अर्थ समजावण्यासाठी एक युक्ती लढविली. शेजारच्या बागेतून दोन रोपे विकत आणली. त्यातील एक रोप घराच्या आत ठेवले तर दुसरे घराबाहेर ठेवले आणि त्यांनी मुलाला प्रश्न केला, “आता सांग बरं, यातील कोणते रोप सुरक्षित राहील’.
मुलगा क्षणात उत्तरला, “घराच्या आत असलेली वनस्पती सुरक्षित आहे, ती वाढेल, पण बाहेरील वनस्पती मुळीच सुरक्षित नाही, त्याला बऱ्याच जंतूंचा, वारावादळांचा सामना करावा लागेल. तसेच कोणताही प्राणी बाहेरचे रोप सहज खाऊ शकतो.’ वडील शांत राहिले आणि त्याला म्हणाले, “योग्य वेळ येईल तेव्हा मी तुला उत्तर देईल.’
त्यानंतर मुलगा पुढे काही दिवसांसाठी बाहेरगावी जातो. जेव्हा तो घरी परत येतो. तो परत आल्यावर पाहतो तर घरातील झाड अगदी तसेच्या तसे व्हरांड्यात असते. त्याची थोडीफार उंची वाढलेली असते. तो त्या झाडाकडे पाहत आपल्या बाबाना म्हणतो, “बाबा, मी म्हटले होते की या झाडाचे काहीही होणार नाही, ते सुरक्षित राहील… पाहिलंत ना.’ वडील हसले आणि त्याला घेऊन घराच्या मागच्या बाजूस गेले. तेथे एक मोठे झाड असते. ते झाड पाहून मुलाला विश्वासच बसत नाही. तो बाबांना म्हणतो, “हे कसं काय शक्य आहे. नक्कीच याला तुम्ही जास्त खतपाणी घातले असणार’.
बाबा म्हणतात, “हो बरोबर आहे बाळा, याला खतपाणी मिळालं, मी नाही टाकलं. त्याने आवश्यक खतपाणी स्वतः निर्माण केलं आणि हे खतपाणी म्हणजे बाह्य परिस्थितीचा स्वीकार करून त्यावर त्याने केलेली मात. आतील वनस्पती सुरक्षित असल्याने, तिला कोणत्याही हवामानाचा सामना करावा लागला नाही किंवा त्याला योग्य सूर्यप्रकाश मिळाला नाही आणि त्यामुळे ते म्हणावे तितके वाढू शकले नाही’.
बाबा पुढे त्याला सांगू लागले, “यातच तुझ्या त्या प्रश्नाचे उत्तर दडले आहे. या झाडाप्रमाणेच जगातील तोच माणूस महान बनू शकतो ज्याने हजारो अडचणी सहन केल्या आहेत. त्याने हार न मानता जिद्दीने त्यांचा सामना केला आहे आणि जो आतील झाडासारखा केवळ सुरक्षित राहण्याचा विचार करतो तो कधीही महान होऊ शकत नाही’. मुलाला प्रश्नाचेच नाही तर आयुष्याच्या एका मोठ्या धड्याचे उत्तर मिळाले.
आपल्या प्रत्येकाचं आयुष्यही त्या रोपट्याप्रमाणे असतं. आपण, आपले पालक आपल्या आजूबाजूचे वातावरण या गोष्टींवर ठरते की ते एक सर्वसामान्य रोपटेच राहणार की वटवृक्षाप्रमाणे भक्कम आणि मजबूत होणार.
बरेचदा आव्हानात्मक परिस्थिती समोर आली असता माझे काय होईल? कसे होईल? माझा निभाव लागेल का? मला तग धरता येईल का? त्यापेक्षा मी आहे त्यातच समाधानी आहे, असे विचार रोपट्याचे यशाच्या वटवृक्षात कधीच रूपांतर करू शकत नाहीत. बरेचदा पालक अतिकाळजी पोटी आपल्या मुलांना अति जपतात. हीच अतिसावधपणे मोठी झालेली मुले जीवनाच्या स्पर्धेत बाद ठरतात. मोठ्या जबाबदाऱ्या, मोठे यश, मोठा आत्मविश्वास आणि मोठमोठ्या संधींना गमावून बसतात.
असं म्हणतात, विजेते कधीही वेगळ्या गोष्टी करीत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. हा वेगळेपणा म्हणजे आपणच आपल्या भोवती आखलेल्या मर्यादेच्या सीमारेषा ओलांडून झेप घेण्याचा प्रयत्न करणे होय. यासाठी आपल्याकडे लागते जिद्द. हा अडीच अक्षरी शब्द अडीअडचणींना अगदी लीलया टोलवून लावतो.
“स्वरभास्कर’ भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी या जिद्दीबद्दल अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे. ते म्हणतात, “प्रतिकूलतेच्या भट्टीत जेव्हा ही जिद्द तावूनसुलाखून निघते आणि वास्तवतेच्या ऐरणीवर भल्याबुऱ्या अनुभवांचे घाव तिच्यावर बसतात, तेव्हाच तिला खरा आकार मिळतो! कारण केवळ स्वप्नरंजनात गुंतून जाऊन ध्येयपूर्ती होत नसते’.
आता आपल्याला आपल्यातील जिद्दीच्या झाडाला अधिक भक्कम करायचे आहे. इच्छाशक्तीच्या मुळांना मेहनतीचे खतपाणी द्यायला हवे. म्हणजे आत्मविश्वासाचे खो तुम्हाला कधीही झुकू देणार नाही. त्यातून ध्येयाच्या फांद्या अधिक विस्तारत जाऊन त्यावर यशाची फळे-फुले डामडौलाने बहरतील. आपल्या या जिद्दीच्या झाडाच्या छायेत पुढील कित्येक पिढ्या प्रेरणा घेऊन घडतील. यासाठीच आता आपलं जिद्दीचं झाड आपण अधिक मजबूत करायला हवं.
सागर ननावरे