म्हसवड – प्रभाकर देशमुख हेच माण- खटावसाठी योग्य नेतृत्व आहे. त्यामुळे फक्त टाळ्या वाजवू नका तर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली घड्याळाच्या चिन्हावर जे उभे राहतील त्यांना निवडून देण्याचं काम करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
दिवड (ता. माण) येथे आयोजित ग्रामीण विकास व सहकार या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, उपसभापती नितीन राजगे, युवा नेते मनोज पोळ, सुरेंद्र गुदगे, तेजस शिंदे, कविता म्हेत्रे, युवराज सुर्यवंशी, अभयसिंह जगताप, तानाजी कट्टे, रमेश पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी कॉंग्रेस हा सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. शरद पवार यांच्या विचाराचे प्रभाकर देशमुख यांचे चांगले नेतृत्व स्वीकारा.’ ऐकणार नाही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा. तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार केला असता तर अनेक प्रश्न सुटले असते. इकडून तिकडे उड्या मारु नका.
सरपंचांनी फक्त कडक राहू नका, तर तुम्हाला मिळणारा निधी चांगल्या कामाला खर्च करा, असे आवाहन त्यांनी केले. मागील निवडणुकीत शरीराने बरोबर पण मनाने दुसरीकडेच असणाऱ्या अशा काही लोकांमुळे अपयश आले. पण खचून न जाता शरद पवार व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाची दृष्टी ठेवून काम करत आहे, असे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.
माण-खटावला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी तुमच्या सर्वांची भक्कम साथ आवश्यक आहे. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आला असून तो राजकीय व सामाजिक परिवर्तन करण्यासाठी उत्सुक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, पोपटराव पवार, शहाजी क्षीरसागर आदी मान्यवराची मनोगते व्यक्त केली. तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.