सातारा -अस्मानी संकट आणि करोना काळात अडचणीत आलेल्या शेतकरी सभासदांच्या उसाची एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम देणारा अजिंक्यतारा साखर कारखाना जिल्ह्यातीलच नव्हे, तर बहुदा राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही अजिंक्यतारा कारखाना व्यवस्थापनाने एफआरपीनुसार उसाचे 100 टक्के बिल वेळेत अदा केले आहे.
कारखाना व्यवस्थापनाचे काटकसरीचे धोरण, योग्य आर्थिक नियोजनामुळे गाळपास आलेल्या उसाची एफआरपीनुसार सर्व रक्कम अदा करता आली. एफआरपीनुसार सर्व रक्कम वेळेत देणारा कारखाना, हा बहुमान अजिंक्यतारा’ने सलग दुसऱ्या वर्षीही मिळवला आहे. आर्थिक मंदी आणि खरीप हंगामाची सुरुवात अशा कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्याला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कारखान्याने हंगामातील उर्वरित तिसरा, प्रतिटन 243 रुपयांचा हप्ताही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर जमा केला आहे.
या गळीत हंगामात अजिंक्यतारा कारखान्याने शासन निर्धारित एफआरपी सूत्रानुसार गाळपासाठी आलेल्या उसाला प्रतिटन 3043 रुपये असा उच्चांकी दर दिला. कारखान्याने 7,31669.657 मे. टन उसाचे गाळप करून 12.82 टक्के अशा विक्रमी साखर उताऱ्याने 8,72,560 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. उसाला प्रतिटन 2600 रुपये पहिला हप्ता आणि त्यानंतर प्रतिटन 200 रुपये दुसरा हप्ता अदा करण्यात आला. मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन सर्जेराव सावंत, व्हाइस चेअरमन विश्वास शेडगे व संचालक मंडळाने योग्य आर्थिक नियोजन केले.
त्यामुळे उसाची एफआरपीतील उर्वरित रक्कम, 243 रुपये प्रतिटन याप्रमाणे एकूण 17.78 कोटी रुपये सोमवारी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये वर्ग करता आली. शेतकऱ्यांनी संबंधित बॅंक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने करण्यात आले आहे. मागील वर्षीसुद्धा एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना वेळेत अदा करण्यात आली होती. ही परंपरा कारखान्याने जपली आहे.
कोणतेही देणे थकीत न ठेवता एफआरपीची 100 टक्के रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना दिली आहे. एफआरपीच्या कायदेशीर तरतुदींचे पालन करून कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांप्रती असलेले उत्तरदायित्व पूर्ण केल्याचे समाधान आहे, असे उद्गार आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी काढले.