विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींना भावना असतात हे सिद्ध केलं. तेव्हापासून वनस्पती या सजीव आहेत या गोष्टीला मान्यता मिळाली. आता तर वनस्पतींच्या जाणिवांवर खूप संशोधन झालं आहे.
अगदी पेशींसारख्या सूक्ष्म सजीवांनाही केंद्रक (न्यूक्लिअस) म्हणजेच प्राथमिक स्वरूपाचा का होईना पण मेंदू असतो. कीटकांनाही अगदी लहान का होईना पण मेंदू असतो. मात्र, वनस्पतींना प्राण्यांसारखा मेंदू नसतो आणि मज्जासंस्थाही नसते. मात्र, यावरून वनस्पती निर्बुद्ध असतात असं समजणं चुकीचं ठरेल.
लाजाळूची पानं स्पर्शानं मिटतात किंवा झाडाची वाढ सूर्यप्रकाशाच्या दिशेनं होते हे आपण सर्वांनी अनुभवलं आहे. परंतु यापलीकडे वनस्पतींना जाणिवा असतात. त्यांना गुरुत्वाकर्षणाची तसंच कंपनाचीही जाणीव असते असं प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे.
मी माझ्या घराच्या गच्चीवर कंपोस्ट आणि जलसंवर्धन (हायड्रोपोनिक्स) अशा दोन प्रकारे भाज्या पिकवतो.
कंपोस्टमध्ये फळांची टरफलं, साली तसंच स्वयंपाकघरात निर्माण होणारा ओला कचरा यांचा वापर होतो तर जलसंवर्धनात माती न वापरता काथ्यासारख्या सच्छिद्र माध्यमाचा आणि पोषक रसायनांचा वापर करण्यात येतो. या दोन्ही प्रकारात वनस्पतींची वाढ होत असताना मी काही निरीक्षणं नोंदवली आहेत. त्यातून वनस्पतींचं विलक्षण वर्तन दिसून येईल.
आपल्याकडे ऱ्याचदा बी-यिाणांचा दर्जा सामान्य असतो. त्यामुळे मी एका ट्रेमध्ये ऱ्याच जास्त यिा लावतो कारण त्यातील काहीच यिांचं रोपांत रूपांतर होतं. पण जेव्हा एका ट्रेमध्ये 3-4 रोपं येतात तेव्हा त्यांच्यात अहमहमिका सुरू होते. मग “बळी तो कान पिळी’ या नात्यानं जे जास्त कणखर असेल ते रोप आपलं वर्चस्व स्थापित करतं. इतर रोपं त्या मानानं लहान राहतात आणि प्रसंगी मरतातही. पण हीच छोटी रोपं दुसऱ्या ट्रेमध्ये लावली तर जोमानं वाढतात. एखादा महाकाय वेल इतर रोपांना वेढून टाकत असेल तर त्या रोपांचं काही खरं नाही. काही काळानं ती रोपं र्दुल होऊन चक्क मरून जातात.
ज्याप्रमाणे मुळांना पाणी दिल्यावर रोप चांगलं वाढतं तसंच पानांवरही पाण्याचा शिडकावा मारल्यास ते तजेलदार दिसू लागतं. एखादं मूल खेळून आल्यावर त्याला आंघोळ घातली की जसं दिसेल तसं. अंगणात लावलेल्या अळूच्या रोपांचा एकदा असा अनुभव आला की त्यातील काही पानं वाढून तिथल्या दरवाजातून घरात प्रवेश करू इच्छित होती. त्यांना दुसऱ्या दिशेला वळवूनही ती पुनःपुन्हा दारातून आत येण्याचा प्रयत्न करीत होती. जणू काही ती मला घरात घ्या असंच म्हणत असावीत!
भोपळ्याच्या वेलाची गंमत न्यारीच आहे. भोपळा जातीच्या एकाच वेलाला नर आणि मादी अशी वेगवेगळी फुलं येतात. आता मधमाशांचं अस्तित्व नगण्य झाल्यानं या दोन्ही प्रकारच्या फुलांमधील परागीभवन हातानं करावं लागतं. मादी फुलाच्या देठाला लहानशा भोपळ्याचा आकार आलेला असतो. मात्र, परागीभवन झाल्याशिवाय तो वाढत नाही, अन्यथा गळून पडतो. जेव्हा फारसा सूर्यप्रकाश नसेल आणि वेलाची मोठी वाढ झाली नसेल तर फक्त नर फुलंच येतात. त्यांचा काहीच उपयोग नसतो आणि ती गळून पडतात.
जेव्हा फळाची पूर्ण वाढ होण्याची शक्यता निर्माण होते तेव्हाच मादी फुलं येतात. तीही 3-4 पेक्षा जास्त येत नाहीत. नर फुलं मात्र बहुसंख्य म्हणजे 10-12 तरी असतात. पाहा, फलधारणेसाठी योग्य वातावरण असेल आणि जेवढी फळं मोठी होण्याची शक्यता असेल तेवढीच मादी फुलं निर्माण होतात. आता हे (फॅमिली) प्लॅनिंग नाही तर काय?
अनेकदा मला अशी जाणीव झालेली आहे की मादी फुलं जणू विनवत आहेत की आता माझं परागीभवन करा, नाही तर मी नष्ट होईन. अशा परिस्थितीत परागीभवन चांगलं होऊन उत्तम फलधारणा होते. कधी एखादा दिवस बाहेर राहिल्यानं लक्ष देता आलं नाही तर कोमेजलेली झाडं जणू आर्जव करताहेत अशी जाणीव होते आणि मग वाटू लागतं की खरोखर प्रेम, वात्सल्य, माया यांची जाण वनस्पतींना नक्कीच आहे.
-श्रीनिवास शारंगपाणी