सातारा – मनामनात भक्ती आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या श्री गणरायाचे वरुणराजाच्या साक्षीने शाहूनगरीत शुक्रवारी जल्लोषात स्वागत झाले. करोनाचे विघ्न दूर करा, असे साकडे घालत सातारा शहरात 210, तर जिल्ह्यात सव्वातीन हजार सार्वजनिक मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. स्वच्छता, सामाईक अंतराचे नियम व शासकीय आदेशांचे पालन करण्यात आले.
करोनासह इतर साथरोगांचा वाढता प्रादुर्भाव, महागाई, अशा चिंता बाजूला ठेवत सातारकरांनी गणरायाचे घरोघरी स्वागत करून षोडशोपचारे पूजा केली. अनेक गणेशभक्त व सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी एक दिवस आधीच बाप्पाच्या मूर्ती घरी व मंडपात आणून ठेवल्या होत्या. श्रींच्या आगमनाची तयारी आणि पूजा साहित्याच्या खरेदीसाठी शुक्रवारी सकाळपासून राजवाडा, देवी चौक, मोती चौक, शनिवार चौक या दरम्यान गर्दी झाली होती.
दिवसभरात साताऱ्यात 210 व जिल्ह्यात सव्वातीन हजार मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. साताऱ्यात पावसाची रिपरिप सुरू असूनही गणेशभक्तांचा उत्साह अभूतपूर्व होता. सातारा नगरपालिकेने भवानी तलाव व बुधवार नाका येथे कृत्रिम विसर्जन तलाव आणि दगडी शाळा, आयुर्वेदिक गार्डन येथे दहा ते वीस विसर्जन कुंडांची सोय केली आहे. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी पालिकेचे कर्मचारी लाइफ जॅकेटस् सज्ज झाले आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली होती.
आता गौराईंच्या आगमनाची प्रतिक्षा
घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर आता महिला वर्गाला गौराईंच्या आगमनाची प्रतिक्षा आहे. रविवार दि. 12 रोजी ज्येष्ठा गौरींना आवाहन, सोमवार दि. 13 रोजी गौरी पूजन आणि मंगळवारी पाच दिवासांचे घरगुती गणपती आणि गौरी विसर्जन हेणार आहे.