मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेची सध्या राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवारांनी काँग्रेसची तुलना नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासोबत केल्याने राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. त्यातच आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील याविषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांचे हे वक्तव्य म्हणजे सोयीचे राजकारण असून आदर्श राजकारणी म्हणणार नाही अशा शब्दांत टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस पक्षाविषयी आपली भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी जुनी जमीनदारी संपली असली, तरी उरलेला राजवाडा कसा सांभाळावा हे समजत नाही. काँग्रेसने आता स्वीकारावे की ते आता जमीनदार राहिलेले नाहीत, असे म्हटले.
“शरद पवार कधी काय बोलतील….एका बाजूला काँग्रेसवर टीका करायची आणि दुसरीकडे त्यांना सोबत घेऊन सरकार चालवायचं. हा प्रकार काय आदर्श राजकारणी म्हणणार नाही. हे सोयीचं राजकारण आहे,” अशी टीका नारायण राणेंनी केली आहे.
“काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात. त्याबाबत एक उदाहरण पवारांनी सांगितले. उत्तर प्रदेशतील जमिनदारांकडे मोठी शेती आणि हवेलीही असायची. कमाल जमीन धारणा कायदा झाला आणि त्यांच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमीन आता १५-२० एकरावर आली. जमीनदार उठतो बाहेर जाऊन बघतो. त्याला पीक दिसते. तेव्हा तो हे सर्व हिरव पीक माझे होते, असे सांगतो. पण सध्या ते त्याचे नसते. तशी अवस्था काँग्रेसची झाली आहे,” असे निरीक्षण पवारांनी नोंदविले.