तीर्थें बाह्यमळु क्षाळे । कर्में अभ्यंतर उजळे ।
एवं तीर्थें जाण निर्मळें ।
सत्कर्मेचि ।। 160 ।।
(अध्याय अठरावा)
जनमानसाचा मान्यता पावलेला पौराणिक सिद्धांत आहे की तीर्थात स्नान केल्याने पाप धुऊन जाते. म्हणजे रोज चोरी करायची, वाईट आचरण करायचे आणि तीर्थात जाऊन स्नान करायचे आणि केलेल्या पापातून मुक्त व्हायचे. किती सोपे आहे ना हे सर्व? मात्र या सर्व पारंपरिक विचारांना ज्ञानोबाराय आपल्या ज्ञानेश्वरीत वेगळा अर्थ आणि स्वतंत्र संदर्भ देतात.
माऊली म्हणतात, पाणी फक्त शरीराचा बाह्यमळ धुऊन काढते. मात्र सत्कर्माने अभ्यंतर उजळून निघते. सत्कर्म पापच नाही तर पापाची समूळ वासनाच धुऊन टाकते. म्हणून सत्कर्मच खरी तीर्थे, निर्मळ तीर्थे आहेत. सत्कर्म करणारा जो कोणी आहे तोच सज्जन आहे. आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी कसे सदाचाराने वागतो तसेच हे संपूर्ण जग आपले कुटुंब आहे. वसुधैव कुटुंबकम् या विचाराने सर्वांनी सदाचारी आचरण करावे.