अशोक सुतार
ममता बॅनर्जी पोटनिवडणुकीला सामोरे जाणार आहेत. यावेळीही ममता यांना रोखण्यासाठी भाजप डावपेच खेळणार त्यामुळे ही पोटनिवडणूकही चुरशीची होणार.
2 मे 2021 रोजी लागलेल्या निवडणूक निकालात भाजपाला रोखत ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा सत्तेत आल्या. पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून पराभवाचे तोंड पाहावे लागले. मुख्यमंत्री पदावर असताना त्यांना सहा महिन्यांत विधानसभेवर निवडून जाणे आवश्यक आहे. यासाठी ममता यांनी भवानीपूर विधानसभा जागेची निवड केल्याचे म्हटले जात आहे. यासाठी भवानीपूरमधील तृणमूल कॉंग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामुळे भवानीपूरमध्ये 30 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. ममता यांना नंदीग्राममध्ये पराभवाचा धक्का देण्यासाठी भाजपने आपली सर्व ताकद लावली होती. दोन हजारांच्या फरकाने ममता विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. आता भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ममता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
2011 च्या विधानसभा निवडणुकीतही ममता बॅनर्जी विधानसभेच्या सदस्य नव्हत्या. तेव्हाही त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती. तेव्हा सुब्रत बख्शी यांनी त्यांच्यासाठी भवानीपूरची जागा सोडली होती. त्यानंतर ममता दीदींनी सीपीएमच्या नंदिनी मुखर्जी यांना 95 हजार मतांनी पराभूत केले होते. 2016 च्या निवडणुकीतही ममता दीदी याच मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. तेव्हा त्यांनी कॉंग्रेस उमेदवार दीपा यांचा 25 हजार 301 मतांनी पराभव केला होता. आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममतांनी भाजपाला आव्हान देत भवानीपूर मतदारसंघ सोडून नंदीग्राममधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांना महाग पडला होता. विशेष म्हणजे पोटनिवडणुकीपूर्वी भाजपमधील चार आमदार तृणमूल कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये समसेरगंज, भवानीपूर आणि जंगीपूर या तीन मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकीच्या घोषणेमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुन्हा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपच्या दिल्लीतील राष्ट्रीय नेत्यांनी गेल्या दोन वर्षांपासून प. बंगालमध्ये संपर्क वाढवला होता. तसेच भाजपचे सरकार केंद्रात असल्याने पश्चिम बंगालमधील अनेक नेते भाजपच्या आश्रयाला गेले होते. त्यामुळे ममता बॅनर्जी या एकट्याच राहिल्या असल्याचा मोठा प्रचार भाजपने केला होता. भाजपच्या बाजूने मोठी गर्दी दिसत असल्याने आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात केंद्रीय मंत्री पश्चिम बंगालमध्ये येत असल्याने भाजपचा तामझाम मोठा होता. विधानसभा निवडणूक झाली, निकाल लागला. त्यांनतर भाजपची राष्ट्रीय मंडळी दिल्लीला गेली.
आता भाजपमध्ये गेलेली मंडळी तृणमूल कॉंग्रेसमध्ये परतू लागली आहेत. भाजप पुन्हा ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी राजकीय डावपेच आखणार का, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीची मतमोजणी 3 ऑक्टोबर रोजी केली जाईल तसेच 30 सप्टेंबरलाच पश्चिम बंगालच्या समसेरगंज, जंगीपूर आणि पिपलीमध्येही पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने कोविड-19 ची परिस्थिती पाहता इतर 31 जागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. घटनात्मक आवश्यकता आणि पश्चिम बंगालच्या विशेष विनंतीचा विचार करून, विधानसभा मतदारसंघ 159-भवानीपूरसाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अत्यंत कठोर निकष लावले गेले असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, संबंधित राज्यांचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांचे मत आणि इनपुट लक्षात घेऊन इतर 31 विधानसभा मतदारसंघ आणि 3 संसदीय मतदारसंघात पोटनिवडणूक सध्या न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता पुन्हा दक्ष झाला आहे, असेच दिसते. कारण मे 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये बाहेरून आलेल्यांची मोठी गर्दी होती. तसेच केंद्रीय मंत्री आठवड्याला चकरा मारत होते. राजकीय नेते पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या काळात गेल्यामुळे तिथे मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी कोविड प्रसाराला नंतर कारणीभूत ठरली होती. आता मात्र निवडणूक आयोगाने कडक निर्बंध लावले आहेत.
एप्रिल-मे 2021 मध्ये झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल कॉंग्रेसने प्रचंड विजय मिळवला आणि 294 पैकी 213 जागा जिंकल्या. मात्र, ममता बॅनर्जी यांना नंदीग्रामची जागा गमवावी लागली होती. एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय असलेले भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममतांना या लढतीत पराभूत केले होते. त्यावेळी ममता यांना आपण ही जागा हरलो, यावर विश्वासच बसला नव्हता. मतदानाची पुन्हा मोजणी करण्यासाठी त्या न्यायालयात गेल्या होत्या. परंतु ममता यांची मागणी मान्य झाली नाही.