सकल तीर्थांचिये धुरे । जियें कां मातापितरें। तयां सेवेसी कीर शरीरें । लोण कीजे ।। 207 ।। आणि संसारा ऐसा दारुणु। जो भेटलाचि हरी शीणु । तो ज्ञानदानीं सकरुणु । भजिजे गुरु ।। 208 ।। (अध्याय 17वा)
संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या भावंडांना आईवडिलांचा सहवास फारसा लाभला नाही; परंतु आईवडिलांची महती, मोठेपणा, श्रेष्ठत्व सांगताना ते म्हणतात, जगात लोकांची पाप घालवणारी जेवढी तीर्थे आहेत, त्या सर्वांत श्रेष्ठ व उगमस्थान जर कोणते तीर्थ असेल तर आपले पूजनीय आई-वडील.
कारण आपणास जन्म देऊन, संस्कार देऊन, आपले भरणपोषण करून आपल्याला वाढवितात, मोठे करतात. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार असतात. त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी आपले शरीर ओवाळून टाकले तरी आपल्यावरील उपकार फिटणार नाहीत.
संत तुकाराम महाराज म्हणतात, आईवडीलच काशी तीर्थ आहेत. दुसऱ्या तीर्थाला जाण्याची गरज नाही. पुंडलिकांनी तेच केले म्हणून विठ्ठल विटेवर उभा आहे.