पुणे (संजय कडू) – भेदरलेल्या चेहऱ्याची नजर… सोबतीला कोणी नसल्याची खात्री… घरातून निघून आल्याची जाणीव… अन् बलात्काराची शिकार… स्वारगेट, स्टेशन, शिवाजीनगर परिसरातील काही नराधमांची ही मोडस ऑपरेंडीच बनली असल्याचे वास्तव पुण्यातील आठवडाभरात झालेल्या दोन सामूहिक बलात्काराच्या घटनांनी उजेडात आली आहे. त्यामुळे या नराधमांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
शहरात दोन सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्या असल्या तरी असे अनेक प्रकार पूर्वापार शहर परिसरात घडत असल्याचे रात्री वावरणाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, या गुन्हेगारांची दहशत आणि या घटनांत मला काय त्याचे, असे म्हणण्याची वृत्ती यामुळे या गुन्ह्याची तक्रारच देण्यास कोणी पुढे येत नसल्याचे बोलले जाते. स्थानिक पोलिसांनाही कल्पना असूनही तपासाचा बोजा न वाढवण्याच्या भूमिकेतून लक्ष दिले जात नसल्याचे पोलीस वर्तूळातील सूत्रांनी सांगितले.
एखादी भेदरलेल्या चेहऱ्याची अबला दिसताच तिला हेरले जाते. तिला विश्वासात घेतले जाते. त्यानंतर तिला कोठे जायचे आहे. रात्रीची वेळ आहे. या भागात लुटालुलट होते वगैरे सांगून तिचा विश्वास कमावला जातो. त्यानंतर तिला माझ्या घरी आई एकटीच आहे, तुम्ही आज घरी रहा, असे सांगून तिला घरी नेण्याच्या बहाण्याने आडबाजूला नेऊन बलात्काराच्या घटना घडत असल्याचे समजते. त्याच बरोबर काही वेळा पैशाच्या अडचणीत असलेल्या महिलेला पैशाचे प्रलोभन दाखवून तिच्यावर बलात्कार केला जातो.
कोणत्याही रेल्वे अथवा बसस्थानक परिसरात अशा गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींचा वावर असतोच, त्याची माहिती पोलिसांना नसते असे नव्हे. मात्र, पोलिसांची नजर चुकवून ते आपले सावज गाठत असतात. आणि आपले इप्सित साध्य करत असतात, असे गुन्हेगारी जगतात सांगण्यात येते. यात काही परप्रांतीय रिक्षाचालक, बारमधील वेटर आणि स्थानिक गुन्हेगारांचा समावेश असतो. बलात्काराच्या या घटना रोखण्यासाठी पोलिसांना गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचीच गरज आहे.
पोलीस ठाण्याचे सहा कर्मचारी दररोज रात्री रेल्वे स्थानक परिसरात नियमित गस्त घालत असतात. रात्रपाळीच्या अधिकाऱ्याचेही परिसराकडे लक्ष असते. पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. तर रिक्षा चालकांसाठी वाहतूक आणि आरटीओ पोलिसांनी पुढाकार घेऊन कारवाई किंवा नियमावली तयार करणे आवश्यक आहे.
– यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
बंडगार्डन पोलीस स्टेशन
हा प्रकार बंडगार्डन पोलिसांच्या हद्दीत झाला, मात्र पोलीस दल एकच आहे, हद्दीचा प्रश्न न ठेवता रेल्वे पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत. प्रत्येक रिक्षा व वाहनांचे कॅमेऱ्याद्वारे जाताना-येताना रेकॉर्डिंग करणार आहेत. प्रत्येक रिक्षा चालकाला आयकार्ड दिले जाईल, रात्रीच्या वेळी त्याच रिक्षा चालकांना स्थानकात प्रवेश दिला जाईल. पोलिसांकडून त्यांचे व्हेरिफिकेशन केले जाईल. रेल्वे पोलिसांकडून वाहन प्रवेश करतात तेथे व बाहेर पडतात तेथे कॅमेरे लावले जातील.
– सदानंद वायसे-पाटील,
पोलीस अधिक्षक, रेल्वे पोलीस
आम्ही माणसे आहोत, समाजाचा एक भाग आहे, अशा परिस्थितीत तो रिक्षावाला आहे की इतर कोणी हा प्रश्न नंतरचा. मुलीला झालेल्या वेदनांचा प्रश्न महत्वाचा आहे. रिक्षावाल्या काकांकडून एकही अपघात किंवा अशी घटना झाली नाही. उलट कॅबवाल्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत असे अनेक प्रकार केल्याचे आपण पाहिले आहेत. यामुळे जे घडले ते आम्हालाही धक्कादायक आहे. रिक्षावाल्यांमध्ये गुन्हेगारी आली, ती रिक्षा परवाना खुला झाल्यानंतर. रिक्षा चालवायला माणसे नाही, यामुळे बॅचधारक असो किंवा नसो, रिक्षा भाड्याने चालवायला दिली जाते. यामुळे रिक्षा चालवणाऱ्यांकडून जे गुन्हे घडतात ते कोणते रिक्षाचालक आहेत, हे पाहाणेही महत्वाचे आहे.
– नितीन पवार, सामाजीक कार्यकर्ते