येरवडा – भामा आसखेड योजनेतून होणारा पाणीपुरवठा जॅकवेलचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शनिवारपासून पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पाणी पुरवठा न झाल्याने येरवडा भागातील नागरिक त्रस्त झाले होते.
भामा आसखेड योजनेतून येरवडा, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव परिसराला पाणीपुरवठा होतो. मात्र शनिवारी जॅकवेलचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पायेरवडा परिसरातील जनता नगर ,भाटनगर,यशवंतनगर,जिजामाता नगर या भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे येथील महिला,लहान मुले सकाळपासून डोक्यावर पाण्याचे हंडे,कळशी घेऊन फिरत होते.
एका हंडा पाण्यासाठी वणवण अजूनही फिरावे लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत होते. करोडो रुपयाची योजना कार्यान्वित करूनही नागरिकांना पान्यायासाठी वणवण भटकावं
लागत असल्याची खंत हे नागरिकांनी व्यक्त केली.
भामा आसखेड जॅकवेलचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. त्या भागात पाऊस सुरु असल्याने कामात अडथळे येत होते. रविवारी सायंकाळपर्यंत अडथळा दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. – प्रज्ञा ढमढेरे (कनिष्ठ अभियंतापाणीपुरवठा विभाग )
येथील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. शनिवार रात्रीपासून पाणी ना आल्याने नागरिकांचे हाल झाले. लोकप्रतिनिधींना याबाबत कळविले मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. – कीर्ती माछरेकर(मनसे कार्यकर्ता )
नागरिकांचे पाण्याविना हाल होत असल्याने काही भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला. -भूषण ठाकूर (सामाजिक कार्यकर्ता )