मेढा -अतिवृष्टी, महापूर, अनेक अडचणी आणि आम्ही भेदरलेले असताना वेळेवर कोणी मंत्री नाही फिरले. उशिरा आले. आले ते आले मात्र अजून काहीच नाही केले. मात्र, आमचे आमदार गुडघाभर चिखल तुडवत आले, रस्ता वाहून गेला असताना पाण्यातूनही आले, आमचे अश्रू पुसले, आधार दिला. सरकारी मदतीची वाट न पाहता पदरची आर्थिक मदत केली.
करोना काळातही सांगाल ते करणारे आमचे ते गोरगरीबांचे खरे “बाबा’ झाले. जावळीचे आमचे हक्काचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेच कामाला आले. ते केवळ आमदारच नाहीत तर जावळीची काळजी घेणारा खरा राजा आम्हांला भेटला, आमचे आमदारच हायतं लयं लयं भारी… अशा प्रतिक्रिया जावळीतील पूरग्रस्त व्यक्त करीत आहेत.
जावळीवर करोनाची अवकृपा झाली. अनेक जीव गेले. अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. कोणाची माय, तर कोणाचा बाप गेला, कर्ता पुरुषच गेल्याने कुटुंबे निराधार झाली. या परिस्थितीमध्येही आणि आता पूरस्थितीत अतिवृष्टीमध्येही पायाला भिंगरी बांधून सर्वात आधी दऱ्याखोऱ्यात अडीअडचणीत पोहचले ते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेच.
करोना काळामध्ये गावात कोणती गरज आहे, कोणत्या गावांत जंतुनाशक फवारले पाहिजे, याबाबत नुसतं त्यांना समजलं अथवा सांगितलं की पहिला आपल्या कार्यकर्त्याला फोन. सॅनिटायझरसह फवारणी गाडी येत आहे. त्याचबरोबर काही मदत लागेल तरी सांगा. रात्री अपरात्री फोन केले तरी तातडीने घेणार, बेड मिळत नाही, ऑक्सिजन उपलब्ध नाही, हे इंजेक्शन भेटत नाही, दवाखान्यात बिल जादा झालंय, असं काहीही काम असो.
लगेचच पाठपुरावा. हे सर्व जावळीकरांनी अनुभवलय. नुसते आमदार म्हणून नायं तर जनतेचा खरा राजा सर्वसामान्यांच्या सेवेत कुठचं कमी पडत नाय, हे त्यांनी दाखवलयं. स्वतःच्या खिशातील लाखो रुपये करोना काळामध्ये खर्च करणारे आमदार शिवेंद्रसिंहराजे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्येही कुठे कमी पडताना दिसले नाहीत.
जोराचा पाऊस, अतिवृष्टी, वारे, वेण्णा नदीच्या महापुराचे रौद्र रूप यामध्ये मध्य व पश्चिम जावळीवर मोठं संकट असताना आमदार शिवेंद्रसिंहराजे कोणत्याही संकटाची पर्वा न करता मिळेल तशी वाट काढत ते तातडीने पुरग्रस्तांपर्यंत पोहचले.
त्यांना आधार दिला. पुरामध्ये वाहून गेलेल्या चौघांच्या त्या चार कुंटुबियांना तातडीने मदत मिळवून दिली. प्रशासनाला तातडीने कामाला लावले. बंद पडलेले रस्ते पूर्ववत करायला लावले, एवढयावरच न थांबता शासनाची मदत येईल तेव्हा येईल.
मात्र, ज्या गावांची पाइपलाइन वाहून गेली, मोटारी खराब झाल्या, इतर काही समस्या होत्या, त्याही तातडीने स्वतःची लाखो रुपयांची पदरमोड करून त्यांनी अनेक गावांना आपले कर्तव्य म्हणून मोफत उपलब्ध करून दिल्या. पुरबाधित गावांना पाणीपुरवठा योजनेसाठी विशेष प्रयत्न करून दहा लाखांचा निधी मंजूर केला. त्यामुळे जावळीकरांच्या मनामनांत आमदार शिवेंद्रसिंहराजे केलेल्या कामाची सेवा ठसली आहे.