नारायणगाव -केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत मंत्रालयाच्या जन आरोग्य योजनेची धनगरवाडी येथील उमा महेश महिला प्रतिष्ठानच्या वतीने नाव नोंदणी करण्यात येत असून या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत आरोग्य सुविधा आणि आरोग्य विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी लाभार्थी म्हणून निवड केलेल्या कुटुंबांतील 2 हजार नागरिकांची नावनोंदणी झाली असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्या व उमा महेश महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रियंका शेळके यांनी दिली. आयुष्यमान भारत योजनाअंतर्गत मोफत नाव नोंदणी व कार्ड वाटप कार्यक्रम चालू करण्यात आले आहे. येडगाव, धनगरवाडी,
भोरवाडी, हिवरे तर्फे नारायणगाव, आर्वी या गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे. आधार कार्ड व पॅनकार्ड वरील नंबर लिंक करून ही नावनोंदणी करायची आहे. यासाठी आधार क्रमांक, पॅन क्रमांक, रेशनकार्ड झेरॉक्स ही कागदपत्रे आवश्यक आहेत. प्रत्येक कुटुंबासाठी 5 लाख रुपयांपर्यंत दरवर्षी विमा संरक्षण असून खासगी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे गरीब कुटुंबांना आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवनेरी भूषण माऊली महाराज वाबळे, विजय महाराज ढवळे, आर्वी गावच्या सरपंच वंदना गाढवे, सदस्य विजय डोंगरे,
प्रशांत डोंगरे, संतोष गावडे, रमेश डोंगरे, शाखा प्रमुख मंगेश डोंगरे, हर्षल गाढवे, सुमित निघोट, जावेद हवालदार, स्वप्निल भोर यांच्या उपस्थितीत झाले. धनगरवाडी गावचे युवा सरपंच महेश शेळके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.