टोकियो – भारताची टोकियो ऑलिम्पिकमधील ब्रॉंझपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने पॅरिस ऑलिम्पिकचेच आता लक्ष्य असल्याचे सांगितले आहे. तसेच पी. गोपीचंद अकादमीतून बाहेर पडून नव्या प्रशिक्षकासह लवकरच सराव करण्यास प्रारंभ करणार असल्याचेही सांगितले आहे. गोपीचंद यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचे सांगून चौवीस तासही उलटत नाहीत तोवर सिंधूने त्यांची अकादमी सोडणार असल्याचे सांगितल्यामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूला दक्षिण कोरियाच्या पार्क ताई सॅग यांनी मार्गदर्शन केले होते. सिंधू अंतिम फेरीत स्थान मिळवू शकली नसली तरीही तिने ब्रॉंझपदकाचा सामना जिंकत पदकाची कमाई केली. हे तिचे ऑलिम्पिकच्या इतिहासातील दुसरे पदक ठरले व अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली.
प्रशिक्षक बदलण्याच्या निर्णयावर बोलताना सिंधू म्हणाली, गेल्या वर्षात जेव्हा करोनामुळे टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन पुढे ढकलण्यात आले. तेव्हा पार्क यांनी खूप मदत केली. करोनामुळे माझ्या मनात एकप्रकारचे नैराश्य आले होते. पण मी पार्क यांच्याकडून अनेक नव्या गोष्टी शिकले. ते माझ्यासाठी उपयुक्त ठरत आहेत तसेच त्यांचे सल्ले मला लाभदायकही ठरले आहेत. त्यामुळेच 2024 साली होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मी त्यांचेच मार्गदर्शन घेणार आहे.
सिंधू पुढे म्हणाली, गोपीचंद अकादमीपासून वेगळे होण्याचा माझा निर्णय योग्य होता. त्यांच्यात आणि माझ्यात कोणताही वाद नाही. गच्चीबाऊली हे आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहे आणि येथील परिस्थिती ऑलिम्पिकसारखी मोठ्या स्पर्धेसारखीच आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये एरियल शॉटचा अंदाज घेण्यास हवेची महत्त्वाची भूमिका होती. मात्र, गच्चीबाऊली स्टेडियममधील सरावामुळे मला याचाही सराव मिळाला, असेही तिने सांगितले.