नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी काश्मिरातील कलम 370 विषयी क्लबहाऊस चर्चेत केलेल्या एका विधानामुळे चांगलाच वाद रंगला आहे. कॉंग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर कलम 370 च्या निर्णयाचा आम्ही फेरआढावा घेऊ, असे विधान त्यांनी त्या कार्यक्रमात केले होते. दिग्विजयसिंह यांचे हे विधान भारत विरोधी असून पाकिस्तानशी त्यांनी हातमिळवणी केल्याचे हे उत्तम उदाहरण आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर केली आहे.
पाकिस्तानी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिग्विजयसिंह यांनी हे विधान केल्याचे भाजपने समोर आणले आहे. याप्रकरणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. त्या चर्चेत दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे की, कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय दु:खद निर्णय होता.
कॉंग्रेस सत्तेवर आल्यानंतर या निर्णयाचा फेरविचार केला जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना दिग्विजयसिंह यांनी आपल्या ट्विटरवर प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, या अडाणी माणसांना इंगजी शाल आणि कन्सीडर या शब्दांचे अर्थ समजत नाहीत.
संबित पात्रा यांनी म्हटले आहे की, दिग्विजयसिंह यांनी त्या कार्यक्रमात भारतावर गरळ ओकली आहे. त्यांचे पाकिस्तानशी संगनमत झाले आहे असे यातून दिसते आहे. याच नेत्यांने यापूर्वी केलेल्या अन्यही वादग्रस्त विधानांचे दाखले यावेळी दिले.
मोदींच्या विरोधात द्वेष निर्माण करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते चीन आणि पकिस्तानशी संगनमत करीत असल्याचा दावाहीं त्यांनी केला. कॉंग्रेसने आपल्या पक्षाचे नाव बदलून ऍन्टी नॅशनल क्लब हाऊस असे ठेवावे अशी उपरोधिक सूचनाही त्यांनी केली. भाजपचे नेते गिरीराज किशोर आणि किरेन रिजीजू यांनीही दिग्विजयसिंह यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे.