जळगाव – तौक्ते चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जळगावमध्ये आले होते. नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊतांवर निशाणा साधला.
संजय राऊत इकडचे आहेत की तिकडचे आहेत तेच कळत नाही. आता ते संपादकही नाहीत. ज्यांच्याकडे लक्ष जात नाहीत, ते लोक आपल्याकडे लक्ष वेधण्याचे काम करत असतात. राऊतही तेच करत आहेत, असा टोला लगावला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे आज जळगावात थेट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी गेले. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात मी गेलो होतो. त्यामुळे त्यांनी मला चहाला बोलवले, म्हणून मी त्यांच्या घरी गेलो. त्यात वावगे असे काही समजू नये, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीवरही भाष्य केलं. पवार आमचे विरोधक आहेत. पण ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची तीन मोठी ऑपरेशन झाली आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेतली. हीच आपली प्रथा परंपरा आहे. मला कोविड झाला होता. तेव्हा पवारांनीही माझी फोनवरून विचारपूस केली होती, असे ते म्हणाले.
करोना संपल्यावर बघू
फडणवीस यांनी राज्यातील सत्तांतरावरही भाष्य केले. सध्या कोविडचा काळ आहे. आमचे सर्व लक्ष त्याकडे आहे. राजकीय सत्तांतर वगैरेकडे आमचे लक्ष नाही. देणार नाही. एकदा संकट गेले तर बघू, असे संकेतही त्यांनी दिले.