मुंबई – कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती आहे. मात्र, तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना अधिक बाधा होईल या भाकिताला कोणताही ठोस शास्त्रीय आधार नाही, अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
उलट महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळलेला नाही, असे स्पष्ट केले.
कोरोनाला बळी पडलेल्या 18 वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे 2021 मध्ये सुमारे 0.07 टक्के इतके आहे. यावरून लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.
राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसऱ्या लाटेत बालकांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यस्तरीय बालरोगतज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकार बालकांवरील उपचारांच्या दृष्टीने रुग्णालयस्तरावर पायाभूत सुविधा, यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करीत असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण होते आहे, त्यामुळे विषाणू स्वतःमध्ये बदल करून लहान मुलांमध्ये शिरकाव करेल, असा एक तर्क आहे. या तर्काला कोणताही आधार नाही. बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेनेदेखील हे सुस्पष्ट केले आहे, असे डॉ. आवटे म्हणाले.
तिसऱ्या लाटेची शक्यता आहे पण ती कधी येईल आणि किती तीव्र असेल या बाबत अनुमान करणे कठीण आहे. मोठ्या माणसाप्रमाणेच लहान मुलांनाही कोविड होण्याची भीती असते पण तिसऱ्या लाटेमध्ये मुले सर्वाधिक बाधित होण्याची शक्यता अगदीच कमी आहे.
90 टक्के मुलांमधील कोविड सौम्य स्वरूपाचा असतो. गंभीर कोरोनाचे प्रमाण मुलांमध्ये अत्यल्प आहे, असे इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रीक्सने निवेदनात म्हटले आहे, याकडे लक्ष वेधून डॉ. आवटे म्हणाले, काही मुलांना आयसीयूची गरज लागू शकते पण त्यांचे प्रमाण फार मोठे नाही आणि ती तयारी आपण करत आहोत.
सध्या माध्यमे राज्यातील किंवा एखाद्या जिल्ह्यातील बाधित मुलांची संख्या सांगून बातम्यांची हेडलाईन्स बनवताना दिसत आहेत. मुळामध्ये मागील सहा महिन्यांमध्ये पाच वर्षाखालील मुलांचे कोविडमुळे बाधित होण्याचे प्रमाण प्रत्येक महिन्यामध्ये साधारणपणे एकूण रुग्णांच्या एक ते दीड टक्क्यांच्या दरम्यान राहिले आहे.
हे आजही बदलताना दिसत नाही तथापि जेव्हा एकूण रुग्ण संख्या दोन लाखावरुन दहा लाखांवर जाते तेव्हा स्वाभाविकच दोन लाखापेक्षा दहा लाखातील दीड टक्का हे निव्वळ संख्येमध्ये अधिक असतात, हे आपण लक्षात घेत नाही, असे ते म्हणाले.
आपण काळजी घ्यावयाची आहेच. आपल्या मुलांचे नियमित लसीकरण पूर्ण झाले आहे ना, याची खात्री करून घ्या. राहिलेल्या लसी नक्की आणि वेळेत पूर्ण करा. तिसऱ्या लाटेच्या भीतीने उगीच मुलावर नको ती बंधने घालू नका आणि स्वतः ही घाबरून जाऊ नका, असे आवाहनही डॉ. प्रदीप आवटे यांनी केले.