रत्नागिरी/सिंधुदुर्ग, – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वादळाचा फटका बसलेल्या ठिकाणांना भेटी दिल्या. रत्नागिरीसह कोकणात तौक्ते चक्रीवादळाने नेमके किती नुकसान झाले आहे, याबाबतचे पंचनामे तातडीने पूर्ण करत संपूर्ण आढावा घेऊन पीडितांना योग्य ती मदत केली जाईल. यापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले.
रत्नागिरी जिल्ह्यात या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत आढावा घेतला. यावेळी ऍड. अनिल परब, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आदी नेते उपस्थित होते. तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यातील 5 तालुक्यांना जबरदस्त फटका दिला आहे. यात सर्वाधिक नुकसान राजापूर आणि रत्नागिरी तालुक्याचे झाले आहे.
जिल्ह्यात चक्रीवादळाने आंबा आणि काजू तसेच नारळाच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर योग्य पद्धतीने पंचनामे करून नेमकी आकडेवारी सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यावेळी त्यांनी कोविडचा देखील आढावा घेतला. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येईल, अशी चर्चा सध्या देशात सुरू आहे. पण आपण योग्य ती खबरदारी आणि उपाय योजना केल्यानंतर तिसरी लाट येणारच नाही. येत्या काळात यासाठी प्रयत्न करु, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
त्याचबरोबर, जिल्ह्यांत झालेल्या नुकसानीबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी तपशीलवार माहिती दिली. चक्रीवादळात अंदाजे 1100 शेतकऱ्यांचे साधारणतः 2500 हेक्टर इतकं नुकसान झाले आहे. यातील 3430 शेतकऱ्यांच्या 810.30 हेक्टरवरील शेतीच्या पंचनाम्यांचे काम आजपर्यंत पूर्ण झाले आहे.
दुसरीकडे चक्रीवादळाचा सर्वाधित फटका विद्युत वितरण कंपनीला बसला. या वादळामुळे 1239 गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडीत झाला होता. आतापर्यंत 1179 गावांचा पुरवठा आता पूर्ववत करण्यात आला आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यावर परतलेल्या बोटींपैकी 3 बोटींचे पूर्णत: तर 65 बोटींचे अशंत: नुकसान झाले आहे. याचा अंदाजित नुकसान खर्च 90 लाख रुपयांपर्यंत आहे.