अकोला : दुसरे लग्न केलेल्या महिलेला जात पंचायतीने पंचांची थुंकी चाटायची आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील वडगाव या गावात घडली आहे.
याप्रकरणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक पत्र लिहून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, पीडित महिलेने साईनाथ नागो बाबर याच्याशी 2011 साली विवाह केला होता. पतीच्या जाचाला कंटाळून तिने सन 2015 मध्ये न्यायालयातून रितसर घटस्फोट घेतला. पीडित महिलेने न्यायालयात जाणे तिच्या नाथजोगी जात पंचायतच्या पंचांना मान्य नव्हते. त्यांनी हा घटस्फोट धुडकावून लावला.
दरम्यान पिंडीत महिलेने 2019 मध्ये अनिल जगन बोडखे या घटस्फोटीत व्यक्तीशी पुनर्विवाह केला. असा पुनर्विवाह पंचांनी अमान्य केला व जात पंचायतने तिला एक लाख रुपयांचा दंड केला.तसेच परिवारास जात बहिष्कृत केले.
पीडित महिलेने पहिल्या नवऱ्यासोबत रहावे, असे पंचांनी सांगितले. पंच नुसत्या दंडावर थांबले नाही तर त्यांनी केळीच्या पानावर थुंकून त्या महिलेला ती थुंकी चाटायची शिक्षा देऊन विकृतीचे दर्शन घडविले.
डॉ. निलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र –
“अशा घटनां सातत्याने घडत असल्याने कठोरपणे कार्यवाही आणि जातपंचायत कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी ठोस पावले उचलने आवश्यक आहे. तसेच जात पंचायतीचे बरेच प्रलंबित प्रश्न आहेत. घटना घडल्यानंतर प्रथमतः तक्रार देण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब होतो आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे माहिती मिळताच पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल करण्याकरिता प्रयत्न करावा”, अशी मागणी डॉ. निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.