परभणी, दि. 6 – मागच्या दीड वर्षाच्या काळात आरोग्य यंत्रणेबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या तलाठ्यांना विमा कवच देण्याची मागणी राज्य तलाठी महासंघाकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. करोनाच्या या संपूर्ण काळात राज्यभरातील तब्बल 100 पेक्षा जास्त तलाठी आपले कर्तव्य बजावत असताना करोना होऊन मृत्युमुखी पडले आहेत.
शिवाय अनेक जण करोनाबाधितही आहेत, एवढे मृत्यू झालेले असताना अद्याप शासनाने तलाठी वर्गाला विमा कवच दिलेले नाही. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या तलाठ्यांच्या कुटुंबांचे हाल होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तलाठी वर्गाला तत्काळ विमा कवच द्यावे, तसेच फ्रंटलाइन वर्कर म्हणून सर्वांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी राज्य तलाठी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.