नवी दिल्ली – देशातील सर्व जनतेला मोदी सरकार मूर्ख समजत आहे. त्यामुळे सरकारविरोधात आता जनतेने उठाव करण्याची गरज आहे, अशी आक्रमक भूमिका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी बुधवारी मांडली.
देशात करोनावरील लसींचा आणि ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यावरून चिदंबरम यांनी ट्विटरवरून वर्धन यांच्याबरोबरच मोदी सरकारवर शाब्दिक हल्लाबोल केला. आरोग्य मंत्र्यांच्या दाव्याने मी चकित झालो. वृत्तपत्रांमधील बातम्या आणि वृत्तवाहिन्यांचे प्रसारण चुकीचे आहे का? सर्व डॉक्टर खोटे बोलत आहेत का? रुग्णांचे कुटुंबीयही खोटी वक्तव्ये करत आहेत का, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजन तुटवड्यामुळे विदारक स्थिती असल्याचे दृश्य देशभरातून समोर येत आहे. त्याशिवाय, लसी वेळेत उपलब्ध होण्याचे मोठे आव्हान राज्यांपुढे उभे राहिले आहे. त्यामुळे विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.