पुणे – अभियांत्रिकीसाठी पदवी घेऊ इच्छिणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दिलासा दिला आहे. यापुढे बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय घेतले नसतील तरीही त्याला अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेता येणार आहे. “एआयसीटीई’ या निर्णयावरून शिक्षण क्षेत्रात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे.
“एआयसीटीई’ने दोन दिवसांपूर्वी 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठीची हस्तपुस्तिका प्रसिद्ध केली. त्यात अभियांत्रिकी प्रवेशाच्या पात्रता निकषात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यापुढे आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी गणित व भौतिकशास्त्र हे विषय बारावीत असणे बंधनकारक नसतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीला प्रवेश घेणे सुकर होणार आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून दरवर्षी 50 टक्के अभियांत्रिकीची जागा रिक्त राहत होत्या. आता नव्या निर्णयामुळे अभियांत्रिकीला प्रवेशाची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.
“एआयसीटीई’ने हा निर्णय शिक्षणात लवचिकता आणण्याच्या नव्या शिक्षण धोरणाच्या धर्तीवर घेतला आहे. नव्या नियमानुसार आता विद्यार्थी बारावीला भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन प्रक्टिसेस, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल व्होकेशनल विषय, कृषी, अभियांत्रिकी ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, आंत्रप्रिनरशीप यापैकी कोणतेही तीन विषय घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीला प्रवेश मिळू शकणार आहे.
विद्यार्थ्यांना तीन विषयांमध्ये एकत्रित 45 टक्के, तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 40 टक्के गुण असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विद्यापीठांनी गणित, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी ड्रॉइंग यासारखे विद्यार्थ्यांच्या सोयीचे ब्रीज कोर्सेस उपलब्ध करावेत, जेणेकरून विविध स्तरातील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांचा लाभ घेणे शक्य होणार असल्याचे “एआयसीटीई’ने म्हटले आहे.
प्रशासकीय कामाला येणार गती
फार्मसी आणि आर्किटेक्चर महाविद्यालयांना यापुढे “एआयसीटीई’ची मान्यता घ्यावी लागणार नाही. या संस्थांना आता केवळ संबंधीत विषयाशी निगडित असलेल्या अनुक्रमे “फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’ आणि “कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’ यांची मान्यता पुरेसे होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय कामात गती मिळणार आहे.