-अमित डोंगरे
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-20 संघात सगळे खेळाडू मॅचविनरच हवेत असे मत व्यक्त केल्याने थोडे आश्चर्य वाटले. मुळात टी-20 सामन्यात एखाद्या गोलंदाजाचे एक षटक संघाला महागात पडू शकते तर एखाद्या फलंदाजाने केलेली वादळी फलंदाजी सामन्याला कलाटणी देते. टी-20 क्रिकेटमध्ये विचार करायलाही वेळ मिळत नाही.
पुढील काळात भारतीय संघ सातत्याने असे सामने खेळणार असल्याने तसेच भारतातच टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत असल्याने इंग्लंडविरुद्धची पाच टी-20 सामन्यांची मालिका अत्यंत महत्वाची बनली आहे. मात्र, कोहलीबरोबरच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री तसेच संघ व्यवस्थापन आणि निवड समिती कोणीही नवोदितांबाबत काही बोलताना दिसत नाहीत.
खरेतर ही मालिका नवोदितांसाठी विश्वकरंडकाची तयारी ठरेल पण कोहलीला केवळ मायदेशातील मालिका सेफ करायच्या आहेत हेच त्याच्या संघ निवडीवरुन उघडपणे दिसत आहे. त्याने रोहित शर्मासह संघातील सर्व अनुभवी व प्रमुख खेळाडूंनाच या मालिकेत खेळवण्याचा मनसुबा व्यक्त केला आहे. मग आगामी काळात होत असलेली आशिया करंडक तसेच टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी नवोदितांना खेळवले जाणार का हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ही मालिका संपल्यावर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. त्यानंतर आयपीएल स्पर्धा आहेच. तसेच लगेचच आशिया करंडक स्पर्धा होणार आहे. त्यानंतर टी-20 विश्वकरंडक स्पर्धा देखील खेळवली जाणार आहे.
मग आत्ता सुरु असलेली इंग्लंडविरुद्धची मालिका संघातील नवोदितांसाठी महत्वाची नाही का. या मालिकेत कोहली, रोहितसह अन्य प्रमुख खेळाडूंनी माघार घेत किमान पहिले काही सामने तरी सेकंड बेंचला द्यायला हवे होते. सेफ गेमची कल्पना मनात असेल तर हरकत कोणालाच नसेल पण मालिका सेफ करुन मग नवोदितांना संधी देण्याचा विचार अनेकांना पसंतही पडेल. मात्र, त्याने भारतीय संघाला पुढील काळातील गुंतवणूक यशस्वी ठरेल असे वाटत नाही.
जर सेकंड बेंचकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या जाणार असतील तर त्यांना सुरुवातीपासूनच्याच सामन्यांत खेळवले गेले पाहिजे तरच त्यांना दडपण कसे हाताळायचे याचे आकलन होईल. इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर या खेळाडूंना तर जास्त संधी दिली गेली पाहीजे, कारण त्यांनी देशांतर्गत स्पर्धांमध्ये कमालीची सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांच्यासह अक्सर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, राहुल चहर यांनाही आगामी विश्वकरंडक स्पर्धा पाहता जास्तीत जास्त संधी द्यायला हवी.
कसोटी मालिका भारताने जिंकली व आता मर्यादित षटकांच्या मालिकेतही विजय मिळवत मायदेशात सेफ गेम खेळण्याचा कोहलीचा विचार अनेकांना पडेल पण नवोदितांना संधी न देता मिळवलेले विजय आनंद देतील पण भविष्यातील समाधान देऊ शकणार नाहीत. मायदेशात होत असलेल्या मालिका जिंकायच्या व सेफ गेमसाठी आग्रही राहायचे या दृष्टीकोनाने भारतीय संघाला सुसज्ज सेकंड बेंचच मिळणार नाही. या नवोदितांना प्रत्यक्ष सामन्यात खेळण्याचा तसेच दडपण हाताळण्याचा अनुभवच मिळणार नसेल तर त्यांच्याकडून आश्चर्यकारक कामगिरीची अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही.
सध्या भारताचा संभाव्य संघ पाहिला तर असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांच्याकडे अफाट गुणवत्ता आहे मात्र, त्यांना संधीच मिळत नाही. त्याचबरोबर संघातून डच्चू दिलेल्या पृथ्वी शॉने हजारे करंडक स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे. त्याच्या बरोबरच देवदत्त पडीक्कलनेही सातत्याने सरस कामगिरी केली आहे. नवोदितांना संधी दिली गेली तरच भारतीय संघाला पुढील काळात सातत्याने भक्कम सेकंड बेंच मिळेल व त्यांच्याच जोरावर जागतिक वर्चस्वही राखले जाईल.