नवी दिल्ली – भारताने निर्यात वाढविण्यासंदर्भात बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत. मात्र जोपर्यंत आपण आयात शुल्क कमी करीत नाही तोपर्यंत जागतिक स्पर्धात्मक बाजारात भारताचे स्थान बळकट होणार नाही, असे नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी म्हटले आहे.
केवळ देशांतर्गत बाजारपेठेवर विसंबून राहता येणार नाही. जे देश वेगाने वाढले आहेत त्यांनी निर्यात पेठेत आपले स्थान मजबूत केले आहे. भारताला जर वेगाने विकसित व्हायचे असेल तर निर्यात पेठेतील सहभाग वाढवावा लागेल असे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी केंद्र सरकारने कंपनी करात मोठी घट केलेली आहे.
त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंकेने महागाई नियंत्रणात ठेवून सध्या व्याजदर कमी पातळीवर ठेवले आहेत. या सकारात्मक बाबी आहेत. उत्पादन आधारीत अनुदान योजना ही निर्यात वाढविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. मात्र जागतिक पातळीवरील आयात आणि निर्यात शुल्क जेवढे आहे त्या पातळीवर भारताचे शुल्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताचे सेवा क्षेत्र ही जमेची बाजू आहे मात्र या क्षेत्रातील रोजगार मजबूत नसतात. त्यामुळे भारताला मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील उत्पादन वाढविल्याशिवाय पर्याय नाही. मात्र गेल्या अनेक दशकापासून भारताचा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे. तो वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.