नवी दिल्ली – खाद्य तेलाचे दर कमी व्हावे याकरिता केंद्र सरकारने गेल्या दोन महिन्यात अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम जाणवत असून घाऊक बाजारपेठेत आठ प्रकारच्या खाद्य तेलाचे दर कमी झाले आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
आगामी काळामध्ये किरकोळ बाजारातही खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता वाढली आहे असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पुरवठा वाढावा, साठेबाजी होऊ नये याकरिता उपाययोजना करण्याबरोबरच आयातही वाढविण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात खाद्य तेलाचे दर कमी झाले असले तरी अजूनही ते गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त पातळीवर आहेत.
आगामी काळातही खाद्यतेलाबरोबरच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीकडे केंद्र सरकारचे बारीक लक्ष राहणार आहे. आगामी काळात बरेच उत्सव येणार आहेत, त्यानंतर काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे दरवाढ होणार नाही याकडे सरकार लक्ष देण्याची शक्यता आहे.