पटना – बिहारमधील खगडिया जिल्ह्यातील सरकारी शाळेची भिंत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या भिंतीखाली दहाहून अधिक लोक दबले असून आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गोगरी येथील चैधा बन्नी चंडी टोला येथे घडली आहे. काही लोक चंडी टोला प्राथमिक विद्यालयाजवळ नाली बनवण्याचे काम करत होते. त्यासाठी जेसीबीने खोदकाम सुरू होते. त्याचवेळी शाळेची भिंत कोसळली. भिंतीच्या बाजूला काही लोक बसले होते. भिंत कोसळ्यानंतर ते त्याखाली दबले गेले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
नाली बनवणाऱ्या मजूरांचा मृत्यू –
स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत नाली बनवणाऱ्या मजूरांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून अजून तिघेजण त्याखाली दबले असल्याची माहिती आहे. लोकांचे म्हणणे आहे की, निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे.