मनुष्य जन्माला येतो ते काही भाव-भावना घेऊनच. जन्मजात शिशूची सर्वात प्रथम कृती असते ती म्हणजे रडणं. हे रडणं म्हणजे केवळ भीतीपोटीच असतं कारण ते बालक अशा जगात प्रवेश करीत असतं की ज्याबद्दल त्याला काहीच माहिती नसते. ज्याला अज्ञाताची भीती म्हणतात. त्या भीतीपोटीच ते रडत असतं. नंतर मातेच्या गंधानं त्याला काही तरी ओळखीचं ज्ञान होऊन ते हसू खेळू लागतं.
मनुष्य-आणि इतर प्राणीही-जन्मापासून भय घेऊन येतात. हे भय माणसाचा मृत्यूपर्यंत पाठपुरावा करीत राहतं. खरोखरीच भयापासून मुक्त माणूस विरळाच. केवळ साधुसंतच भयमुक्त असावेत. सर्वात मोठं भय हे मृत्यूचं असतं. परंतु याशिवाय माणसाला इतर अनेक भयं कायम ग्रासत असतात. भर्तृहरिनं वैराग्यशतकात विशिष्ट भयांचं छान वर्णन केलं आहे:
भोगे रोगभयं कुले च्युतिभयं वित्ते नृपालाद्भयं
मौने दैन्यभयं बले रिपुभयं रूपे जराया भयम् ।
शास्त्रे वादिभयं गुणे खलभयं काये कृतान्ताद्भयं
सर्वं वस्तु भयान्वितं भुवि नृणां वैराग्यमेवाभयम् ।्।
भोग रोगाचं भय निर्माण करतात तर कुळाचा अभिमान बाळगणाऱ्यांना भ्रष्ट होण्याचं भय असतं. राजाला धनराशीचं भय असतं तर गप्प राहणाऱ्याला शत्रूचं भय असतं. रूप असणाऱ्यांना वार्धक्याचं तर शास्त्र जाणकारांना वादविवादाचं भय असतं. गुणी माणसाला दुष्टांचं भय आणि शरीराला मृत्यूचं भय सतावीत असतं. केवळ वैराग्य असलेल्या व्यक्तीला कशाचंही भय उरत नाही. पण सामान्य माणसाला भयापासून मुक्ती नाही. चाणक्यानंही
आहार निद्रा भय मैथुनं च
सामान्यमेतत्पशुभि: नराणाम् ।
धर्मो हि तेषामधिको विशेष:
धर्मेण हीना: पशुभिः समाना: ।।
अशीच सामान्यांची पशूंप्रमाणे गती असल्याचं सांगितलं आहे.
लहान मुलांना अंधाराची भीती वाटत असते. मोठ्यांना करोना कधी संपेल हे माहीत नसल्यामुळे एक अनामिक भीती वाटत राहते. शेअर बाजारातील उतार-चढावाबद्दल अशा अनिश्चित गोष्टींची नेहमी भीती वाटत असते. उद्या सूर्य उगवणार की नाही याची भीती कुणाला वाटत नाही कारण ती गोष्ट अनिश्चित नाही.
सर्वात चमत्कारिक गोष्ट म्हणजे मृत्यू अनिवार्य आहे हे माहीत असूनही आपण अमर असल्याच्या थाटात माणूस वावरतो. तो खचित घाला घालणार आहे हे ज्ञात असतानाही त्याची भीती मानवाला वाटत असते. सजीवाला पुनरुत्पत्तीची देणगी जी मिळाली आहे ती कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात आपण जिवंत असल्याचं (संततीच्या स्वरूपात) समाधान देणारी असल्यानं मानव पुत्र-कन्या, नातू-नात, पणतू-पणत झाल्यावर आनंद व्यक्त करतो किंवा त्यांची वाट पाहत राहतो. अशा प्रकारे त्याला मृत्यूवर मात केल्याचं समाधान (?) मिळतं.
क्रांतिकारकांसारखी असामान्य धैर्य असलेली माणसं मृत्यू समोर ठाकलेला असताना किंवा हाल-अपेष्टा सहन करताना दिसतात. त्यांना भय या भावनेचा लवलेशही नसतो. याउलट, मी काही माणसं अशी पाहिली आहेत की उद्या बॉस आपल्या चुकीबद्दल खूप झापेल या भीतीनं दांडी मारण्याचा विचार करतात. एका अशा मित्राला मी सांगितलं, अरे बाबा, तू किती दिवस असं झापणं टाळत राहशील? आणि जेव्हा केव्हा तुम्ही समोर याल तेव्हा तो ती चूक आठवून झापणार नाही हे कशावरून? त्यापेक्षा आपला डिफेन्स कसा करायचा याचा खोलवर विचार करून सामोरा जा. त्यातच शहाणपण आहे.
भय आणि चिंतेमधून मुक्त व्हायचं असेल तर मनाला-विशेषत: बुद्धीला-चालना देणाऱ्या कृतीत गुंतवून ठेवलं पाहिजे. कोडी सोडवणं किंवा टेबल टेनिस किंवा बॅडमिंटन यासारखा स्पर्धात्मक खेळ खेळणं आवश्यक ठरतं. जेणेकरून भय या भावनेकडे वळायला मनाला वेळच मिळू नये. धावण्यासारख्या व्यायामाचा निदान या तरी कारणासाठी उपयोग होत नाही. कारण धावत असताना मन पुन्हा भयाकडे किंवा चिंतेकडे वळू शकतं. बॅडमिंटनसारख्या अतिशय थकवणाऱ्या खेळाचा उपयोग असा होतो की खेळताना मन प्रतिस्पर्ध्यावर मात कशी करायची यामध्ये गुंतलेलं असतं तर रात्री शारीरिक थकव्यामुळे झोप लागते आणि भयापासून मन विचलित होऊन जातं. भय हे प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी ग्रासतच असतं. त्याचा सामना करणं अवघड खचित आहे पण अशक्य नाही.
श्रीनिवास शारंगपाणी