-विनोद मोहिते
इस्लामपूर – प्रो कबड्डी, महा कबड्डीने कबड्डी खेळास घरा-घरापर्यंत नेत देशातील, राज्यातील खेळाडूंना व्यावसायिक व्यासपीठ मिळवून दिले आहे. जयंत कबड्डी लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनाही तसेच व्यावसायिक व्यासपीठ मिळताना या लीगमधून अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडतील,असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर ( जिल्हा सांगली) येथील जयंत पाटील स्पोर्ट्स तर्फे आयोजित जयंत प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. युवा नेते प्रतीक पाटील, मुख्य संयोजक, नगरसेवक खंडेराव जाधव, सांगली जिल्हा कबड्डी असो.चे अध्यक्ष रामभाऊ घोडके,पुणे जिल्हा उप कार्याध्यक्ष अण्णासाहेब देशमुख, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने प्रामुख्याने उपस्थित होते. सांगली जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने ही पाच दिवस चालणारी लीग घेतली आहे.
ना. जयंत पाटील म्हणाले,” क्रिकेटसारख्या खेळाला आयपीएल स्पर्धेमुळे अनेक नामवंत खेळाडू देशाला मिळाले. प्रो कबड्डीने ग्रामीण भागातील खेळाडू घडवले. आता वाळवा तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांचे कौशल्य ओळखून इस्लामपूरची जयंत प्रीमियर लीग राज्य पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवेल.
वाळवा तालुक्याला कबड्डीची मोठी परंपरा आहे. नितीन मदने याने इस्लामपूरचे नाव कबड्डीच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.नगरसेवक खंडेराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डीची यशस्वी परंपरा पुढे नेली जात आहे. कबड्डी स्पर्धेतून भवितव्य घडावे यासाठी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.”
ना. पाटील म्हणाले ,” दरवर्षी सातत्य ठेवत ही स्पर्धा चालू राहिली तर अनेक नवे खेळाडू घडतील. ग्रामीण खेळाडूमध्ये कबड्डीची आवड निर्माण करण्यासाठी प्रीमियर लीग उपयुक्त ठरेल.स्थानिक वृत्तवाहिनीवरील थेट प्रक्षेपणामुळे खेळाडूंची विविध कौशल्य विविध अंगांनी चित्रित केली जाणार आहेत. त्यामुळे खेळाडूंना आपली कसब दाखवण्याची चांगली संधी आहे. यातून उत्कृष्ट खेळाडूंना भविष्यातील संधी देता येतील.”
नगरसेवक खंडेराव जाधव म्हणाले.” इस्लामपूर शहराला कबड्डीचा वारसा आहे. राज्य पातळीवरील अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजनानंतर तब्बल वीस वर्षानंतर ग्रामीण भागातील कबड्डीची प्रीमियर लीग होत आहे. आठ संघांच्या माध्यमातून परिसरातील खेळाडूंना लिलाव पद्धतीने घेऊन या स्पर्धा होत आहेत.स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना कौशल्य दाखविण्याची संधी आहे. परिसरातील उद्योजकांनी पहिल्याच वर्षी जयंत प्रीमियरलीग साठी संघाची खरेदी करून विश्वास दाखवला.”
यावेळी सर्व संघ मालकांचे सत्कार मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.आतंरराष्ट्रीय खेळाडू नितीन मदने यांचा यावेळी गौरव करण्यात आला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी शरद लाहिगडे हरिकन्स,विरुद्ध कै.जगदीश आप्पा पाटील रायडर्स,तसेच स्फूर्ती रॉयल्स विरुद्ध राजेंद्रभाऊ पाटील फायटर्स यांच्यामध्ये सामने खेळविण्यात आले. यावेळी विनायक पाटील,पै.भगवान पाटील, शहाजीबापू पाटील, बाळासाहेब पाटील,देवराज पाटील,रणजित पाटील,सुभाषराव सूर्यवंशी,लिंबाजी पाटील,ब्रह्मनंद पाटील,अतुल लाहिगडे,पृथ्वीराज पाटील,शिवाजी पवार यांच्यासह पदाधिकारी,तसेच खेळाडू,व कबड्डी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अरुण कांबळे,आयुब हवलदार, सदानंद पाटील, सागर जाधव,उमेश रासनकर,विजय (सोन्या) देसाई यांच्यासह जयंत स्पोर्ट्सचे खेळाडू, सदस्य लीगचे नियोजन करीत आहेत. स्पर्धेच्या सुरवातीला सोमवारी आज दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून उघड्या ट्रॉली मधून खेळाडूंची मिरवणूक काढत संचालन केले गेले.
युवा नेते प्रतीक पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यल्लाम्मा चौक,गांधी चौक,कोर्टपासून हे संचलन मिरवणूक स्पर्धा स्थळी नेण्यात आले. सायंकाळी मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले.किशोर गावडे (मुंबई) ,प्रसाद कुलकर्णी (राजारामनगर) यांनी सूत्र संचालन केले.
आठ संघ साखळी पध्दतीने खेळणार आहेत. दररोज दुपारी ४ ते रात्री १० पर्यंत सहा सामने खेळविले जाणार आहेत. कबड्डी प्रेमींच्या बसण्यासाठी गॅलरीची व्यवस्था केली. यामध्ये महिलांची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.