कोलकाता – करोनाच्या विषाणुंपेक्षा भाजपच अधिक घातक आहे असे विधान तृणमुल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहॉं यांनी केले आहे. पश्चिम बंगाल मधील 24 परगणा जिल्ह्यातील एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला.
देशात हिंदु आणि मुस्लिमांमध्ये हाच पक्ष भांडणे लावून वैमनस्य निर्माण करीत असतो असा आरोपही त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बंगाली संस्कृती माहिती नाही आणि त्यांचा मानवतेवरही विश्वास नाही असे त्या म्हणाल्या.
हा पक्ष देशाला करोना पेक्षाही घातक ठरत आहे. नुसरत जहॉं यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपचे पदाधिकारी अमित मालवीय यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की तृणमुलचे नेते अशाच स्वरूपाची बेताल बडबड करीत आहेत पण त्यांच्या नेत्या ममता बॅनर्जी मात्र त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे.
या आधी तृणमुलचे मंत्री सादिकुल्ला चौधरी यांनीही असेच आक्षेपार्ह विधान केले होते आता नुसरत जहॉं बरळल्या आहेत पण ममता बॅनर्जी या तुष्टीकरणाची राजनिती करीत असल्याने त्या या नेत्यांवर कारवाई करणार नाहीत असे मालवीय म्हणाले.