वेळोवेळी योग्य काळजी घेतल्यास प्रत्येक स्त्रीपुरुष या प्राणघातक रोगाशी योग्य मुकाबला करू शकतो. हृदयाच्या रोगाचा इतिहास अनुवांशिकतेमध्ये मिळाल्यास प्रथमपासूनच जास्त वजन वाढू न देणे, धूम्रपान न करणे, मद्य किंवा जास्त प्रमाणात आहार न घेणे, स्निग्ध पदार्थ किंवा साखर जास्त प्रमाणात न घेणे ह्या काळज्या घ्याव्यात.
याउलट ज्वारी, बाजरी यांसारखी धान्ये, तसंच जास्त प्रमाणात तंतू असलेली (न पचता शिल्लक राहणार भाग) कडधान्ये, भाजीपाला व फळे आहारात घ्यावीत. तसेच रोज नियमित व्यायाम घ्यावा- रोज 45 ते 50 मिनिटे भरभर चालणे, शवासनासारखी योगासने करावीत.
जर एखाद्यास आपल्या हृदयाची स्थिती जाणून घ्यायची इच्छा असेल तर, ब्लड प्रेशर, ई.सी.जी., छातीचा एक्सरे, रक्तामधील क्लोरेस्ट्राल, ट्राय ग्लिसराईड यासारख्या तपासण्या करून घ्याव्यात. यामध्ये काही प्रमाणात दोष आढळल्यास तो नाहीसा करण्यासाठी आहार-विहारात बदल व वर नमूद केलेली कारणे न घडवून देणं हे महत्त्वाचं ठरेल.
वयाची चाळीशी उलटल्यानंतर महिला व पुरुषांमध्ये आजाराचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होते. चांगले आरोग्य व वयोमान वाढवयाची एक प्रकारची पहिली पायरीच असते. चाळीशीमध्ये आपले आरोग्य चांगले राहण्याचा व तो वाढवण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये आरोग्याच्या तपासणी करून त्यावर वेळीच उपचार करून घेणे गरजेचे आहे.