पुणे : बाणेर-बालेवाडी सोबतच महापालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या सूस-म्हाळूंगे गावांच्या विकासासाठी महापालिकेच्या 2021-22 च्या अगामी अंदाजपत्रकात विशेष आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार तसेच स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिले असल्याचे माहिती महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी दिली. महापालिका आयुक्तांकडून 29 जानेवारी रोजी 2021-22 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बालवडकर यांनी नुकतेच बाणेर-बालेवाडी या स्मार्ट सिटीच्या हद्दीलगतची ही दोन्ही गावे असल्याने या गावांसाठी अंदाजपत्रकात विशेष तरतूद करण्याची मागणी करणारे पत्र आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह स्थायी समिती अध्यक्ष रासने यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सुस व म्हाळुंगे या दोन्ही गावात गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणात नागरिकरण वाढलेले आहे. त्यामुळे या याभागातील लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत चालली आहे. या वाढत्या लोकसंख्येसोबतच या भागातील अनेक प्रश्न गेली वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. हा भाग गेली अनेक वर्षांपासून महानगरालगत असून देखील पायाभूत मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने पाणी, रस्ते, ड्रेनेज लाईनचा अभाव या भागात मोठ्या प्रमाणात आहे. परंतु हि गावे ग्रामपंचायत हद्दीमध्ये असल्याने या गावांना पुणे म.न.पा.च्या अथवा महानगरामधील इतर सोयी सुविधांचा तेवढा लाभही मिळाला नाही. त्यामुळे आता ही गावे पालिकेत समाविष्ट होत असताना या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन, रस्ते, पिण्याच्या पाण्याचे टॅंकर पुरविणे, ड्रेनेज लाईन या पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी 2021-22 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून या गावांसाठी विशेष तरतूद उपलब्ध करून द्यावी अशी मागणी बालवडकर यांनी या पत्रात केली आहे. त्याला महापालिका आयुक्तांनी सकारात्नक प्रतिसाद देत अर्थसंकल्पीय तरतूद 2021-22 च्या अंदाजपत्रकात या नव्याने समाविष्ठ झालेल्या गावांसाठी पायाभूत सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने विशेष तरतूद दिली जाईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या भागातही महापालिकेच्या माध्यमातून औंध-बाणेरच्या धर्तीवर स्मार्ट सिटी प्रमाणेच लवकरच सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.