दै. प्रभातने यंदा 90 वर्षे पूर्ण करून 91 व्या वर्षांत पदार्पण केले. कुठल्याही वृत्तपत्राचा इतिहास हा समाज जीवनातील स्थित्यंतरांचा इतिहास असतो. दै. प्रभातने गेल्या 90 वर्षांत जी स्थित्यंतरे अनुभवली, त्यावरून समाजातील विविध बदलांचे चित्र सहज नजरेस पडते.
आजवरच्या प्रवासात दै. प्रभातने आपली नि:पक्षता जपली आहे. “प्रभात’ची भूमिका कधीच कुणाच्या आहारी गेली नाही, या अभिमानास्पद वस्तुस्थितीची नोंद ज्येष्ठ पत्रकार वसंत काणे यांनी एका ठिकाणी दिली होती. श्रेष्ठ कवी “कुसुमाग्रज’ अर्थात विअ. वा. शिरवाडकर दै. प्रभातमध्येच होते आणि “गर्जा जयजयकार क्रांतीचा’ ही कविता त्यांना याच कालखंडात स्फुरली. डॉ. बाबा आढाव यांनी दै. प्रभातच्या बांधिलकीविषयी एका ठिकाणी लिहिताना म्हटले की, “दै. प्रभात हा कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज आहे.
तळागाळातील लोक, कष्टकरी यांच्याशी दै. प्रभातचा सांधा जुळलेला आहे. वकील वर्गाशी तर दै. प्रभातचा एक वेगळाच ऋणानुबंध आहे. बदलत्या काळात दै. प्रभातने युवक-युवती, स्त्रीवर्ग, विद्यार्थी, बाल व किशोरवयीन वाचक तसेच मध्यमवर्गीयांबरोबरच उच्चभ्रू, सधन वर्गातही स्थान मिळविले आहे.’
पत्रमहर्षी श्री. वा. रा. कोठारी यांनी “प्रभात’ नावारूपाला आणला. तो अनेक चळवळींचे मुखपत्र बनला. त्यांनी घालून दिलेल्या लोकाभिमुख पत्रकारितेची सदैव आठवण ठेवूनच प्रभातने 91 व्या वर्षांपर्यंत दमदार वाटचाल केली.
संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यात आणि गोवा मुक्ती संग्रामात प्रभातने बजावलेली भूमिका देदीप्यमान अशीच आहे. आज 91 वर्षांत पदार्पण करताना सुवर्णाक्षरांनी नोंदवल्या गेलेल्या प्रभातच्या कामगिरीचे स्मरण अपरिहार्य आहे.
नव्या युगाप्रमाणे पाऊल टाकणारा…
नवीन तंत्रज्ञान आणि नवीन बदलांना सामोरे जाताना प्रभातही काळाच्या बरोबरीने पावले टाकत आहे. अत्याधुनिक यंत्रणा आणि प्रणालीचा अवलंब करून प्रभातने आपल्या कार्यालयातील विविध विभागांची सुरेख अंतर्गत सजावटही केली आहे.
“दै. प्रभात’ – निर्भीड, निष्पक्ष
निर्भीड, निष्पक्षपाती वृत्तीने राजकारणी ते सामान्य, कष्टकरी माणसाला बरोबर घेऊन त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत “दैनिक प्रभात’ने वृत्तपत्र क्षेत्रात एक वेगळाच मानदंड निर्माण केला आहे. “प्रभात’ हे एकमेव दैनिक असे म्हणता येईल की, ते कोणत्याही राजकीय पक्षाला बांधलेले नाही. खरेखुरे सामान्य वाचकांचे, सर्वांचे हक्काचे वृत्तपत्र म्हणता येईल. “प्रभात’च्या सर्वच संपादकांनी वा. रा. कोठारी यांनी दाखवलेल्या प्रकाशवाटेवरून यशस्वी वाटचाल केली. पुढील काळातील संपादकांनीही ही वाट कधीच सोडली नाही. “प्रभात’ची भूमिका एका सरळ धाग्यात गुंफण्यात आजपर्यंतच्या सर्व संपादकांचा सिंहाचा वाटा आहे.
‘दै. प्रभात’ वाचकांच्या मनात अढळस्थानी
गेली 90 वर्षे असंख्य वाचकांच्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करणारा दै. प्रभात आज महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. वाचकांच्या हृदयात अढळस्थान निर्माण केल्यामुळेच हा टप्पा गाठणे शक्य झाले आहे. संस्थापक कै. वा. रा. कोठारी यांनी केलेली भक्कम पायाभरणी आणि वाचकांच्या प्रेमाचा तितकाच टिकाऊ मुलामा, यामुळे “प्रभात’रूपी चिरेबंदी वाड्याला पुढील कित्येक वर्षे साधा तडाही जाण्याची सुतराम शक्यता नाही.
कोठारींच्या दिशादर्शनानुसार मार्गक्रमण करताना, विविध चळवळींना पाठबळ देण्याचे आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम “दै. प्रभात’ने सातत्याने केले आहे. तसेच, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडताना सामान्य माणसाचा आवाज होण्याचे कार्यही एखाद्या व्रताप्रमाणे जपले आहे. श्री. कोठारी यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी “दै. प्रभात’च्या माध्यमातून दिलेले योगदान एक अमिट छाप सोडणारे आहे. या चळवळीचे एक धुरीण असणाऱ्या आचार्य अत्र्यांनी ही चळवळ अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी “दै. प्रभात मुंबईतूनही सुरू करण्याची’ इच्छा व्यक्त करावी, यातच सारे काही आले.
तळागाळातील वर्गासाठी, कष्टकरी जनतेसाठी, सामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रभात एक मित्र बनून राहिला आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नाला वाचा फुटावी आणि विधायक कार्यासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचे चीज व्हावे, अशीच भूमिका “दै. प्रभात’ने नेहमीच ठेवली आहे. साखळी वृत्तपत्रांच्या प्रचंड स्पर्धेतही “दै. प्रभात” आपले वाचकांमधील स्थान टिकवून आहे, ते यामुळेच.
पुरोगामी मूल्य जपणारा प्रभात
भारतीय संविधानाने नागरिकांना सहा प्रकारचे मूलभूत अधिकार बहाल केले आहेत. या अधिकार किंवा हक्कांची जनतेला जाणीव करून देण्यात “प्रभात’ची भूमिका महत्त्वाची आहे.
नागरिकांच्या हक्कांवर गदा आल्यास प्रसंगी सरकारशी भिडणारे दैनिक म्हणजे “प्रभात’, अशीही जनमानसांत “प्रभात’ची ओळख निर्माण झाली आहे. संपादक माधवराव खंडकर यांनी “प्रभात’ची प्रतिमा अधिक स्वच्छ आणि पारदर्शी केली. त्यामुळे सर्वसामान्यांना “प्रभात’ आपला पेपर वाटायचा. हीच नाळ आजही वाचक आणि प्रभात यांच्यात जोडलेली दिसून येते.
‘दै. प्रभात’ तरूण अन बहरलेला वटवृक्ष
वय वाढतंय तसतसा “प्रभात’ तरुण होतोय. नवनवीन गोष्टींचा अंगीकार करताना आज “दै. प्रभात’चं बदललेलं रूप साजिरं असंच आहे. आकर्षक छपाईमुळे प्रभात इतर वृत्तपत्रांपेक्षा अधिक तरुण दिसतो. “प्रभात’ च्या या रोपाला कोठारी यांनी पाणी घालून वाढविले, फुलविले. आज या रोपाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाचा भक्कम पाया शहर पुणे आवृत्ती आहे.
पुणे ग्रामीण आवृत्ती, पिंपरी-चिंचवड आवृत्ती, अहमदनगर आवृत्ती आणि सातारा आवृत्ती या बहरलेल्या फांद्या आहेत. बातम्या आणि माहितींनी बहरलेल्या वटवृक्षाच्या छायेत वाचक विश्वासाने तृप्त व समाधानी होताना दिसतो. या तरुण वटवृक्षाच्या छायेत 90 वर्षे ऋषीतूल्य तपस्वींनी वाचकांना विद्वत्तेच्या बळावर समाजहितासाठी योग्य असे नेतृत्त्व केले. ही नेतृत्त्वाची मार्गदर्शकाची भूमिका बजावताना “प्रभात’ या प्रगतीशील व पुरोगामी समाजाशी समरस होऊन, त्याचा एक भाग बनून राहिला आहे, हे विशेष.
डिजिटल “प्रभात’
काळासोबत तंत्रज्ञान बदलते आहे. इंटरनेटने या बदलांना अधिक गती दिली आहे. हे तंत्रज्ञान दैनिकांसाठी कामकाजातील असेल, व नागरिक, वाचकांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत असेल, पण बदलत्या ऑनलाईन वाचकांची ज्ञान, माहिती व मनोरंजनाची भूक भागवणारा “दै. प्रभात’ वाचकांच्या सोबतील सातत्याने आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची सोबत मिळवत “डिजिटल प्रभात’नेदेखिल मोठी मजल मारली आहे. आधुनिक काळाला अभिप्रेत अशा सोशल मिडीयासह सर्वच आघाड्यांवर “डिजिटल प्रभात’ दररोज 15 लाख वाचकांचा “रिच’ असलेला “डिजिटल प्लॅटफॉर्म’ ही एक नवी ओळख रूजली आहे; आता ती जोमाने बहरती आहे. “डिजिटल प्रभात’ नव्या व तरुण वाचकांसोबत तंत्रज्ञानस्नेही ज्येष्ठ वाचकांना हवी असणारे सहज व विश्वासार्ह व माहितपूर्ण “न्यूज फीड्’च्या माध्यमातून अधिक मजबूतपणे जोडून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.
बदलता “दैनिक प्रभात…’
सुरुवातीला चार पानी असलेला प्रभात आज मुख्य अंक 16 पानी, आरोग्य पर्व, आरोग्य जागर, अस्मिता, कायदाविश्व, रूपगंध असा सर्वांगाने विविधतेने नटलेला आहे. सुरुवातीचा चार पानी “प्रभात’ विश्वासार्ह व ज्ञान, माहितीचा खजिना असायचा. सत्यता सांगणारी बातमी, बातमीमागची अधिकची सत्यता व माहितीचा सोपा उलगडा करणारा स्पेशल रिपोर्ट, प्रेरणा देणाऱ्या यशस्वितांच्या जीवनकथा, विद्यार्थी व तरुणांच्या आयुष्याच्या महत्त्वाच्या वळणावर मार्गदर्शकाची भूमिका बजावणारी “दहावी अभ्यासमाला,’ करिअरच्या दिशा सांगणारी मान्यवरांची सदरे, ही वेगळी ओळख सांगता येईल.
“प्रभात’ घराघरातील प्रत्येकाचा सोबती आहे, असे म्हणणेच अधिक उछित ठरेल. नवीन तंत्रज्ञान आणि नवीन बदलांना सामोरे जाताना “प्रभात’देखिल काळाच्या बरोबरीने पावले टाकत आहे. अत्याधुनिक यंत्रणा आणि प्रणालीचा अवलंब करून “प्रभात’ने आपल्या कार्यालयातील विविध विभागांची सुरेख अशी अंतर्गत सजावटही केली आहे.
प्रभात दीपोत्सव
“प्रभात दीपोत्सव’ हा प्रभातचा दिवाळी अंकही साहित्यातील एक अमूल्य ठेवा ठरावा, अशी वाटचाल करीत आहे. “प्रभात’शी ऋणानुबंध असलेल्या वाचकांना सांभाळतानाच नवीन वाचक वर्गाशी नाते जोडण्यासाठी “प्रभात’ अथक प्रयत्नशील आहे. लोकांच्या गरजा ओळखून “प्रभात’मध्ये नवनवीन बदल केले जात आहेत. यापुढेही ही वाटचाल अशीच नेटाने व निप:क्षपणे सुरू राहील. म्हणूनच “प्रभात’चा प्रभाव टिकून असेल.
सत्य व निप:क्षता ही भूमिका पानापानात सामवलेल्या “दैनिक प्रभात’चा संपादकीय, जाहिरात व मार्केटींगसह वितरण, मुद्रण, प्रशासन व व्यस्थापन अशा विविध विभागांतील सर्व कर्मचारी, सेवक आणि सहकाऱ्यांच्या समर्पित वृत्तीने होत असलेल्या कार्याच्या बळावर “दै. प्रभात’ची शक्की वाटचाल नेटाने सुरु आहे. पण या वाटचालीत आपण सर्व वाचक, जाहीरातदार, वितरक व सहभागी अन्य सर्व घटकांसह हितैषी नागरिकांचे पाठबळ अधिक गरजेचे आहे. ते सदैव सोबत राहील, ही खात्री आहे.
करोना काळातील आधारस्तंभ
वर्ष 2020 मध्ये साऱ्या जगाने करोनाच्या संकटाचा सामना केला. हे संकट अनाकलनीय आणि प्रचंड असे होते. तो धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. “प्रभात’नेही या काळात लोकांना धीर देण्याचे आणि या महामारीपासून वाचण्यासाठी आरोग्यविषयक जनजागृतीचे महत्त्वाचे कार्य केले.
आपल्या स्वत:च्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेत, प्रसंगी आव्हान स्वीकारत हे जनजागरणाचे काम ‘दै. प्रभात’च्या संपूर्ण “करोना-योद्ध्यांच्या’ टीमने नेटाने केले. करोना संकटाच्या काळात मागील अठ ते नऊ कालावधीत “दै. प्रभात’ने करोना संकट तसेच विविध अरोग्यविषयक पैलूंवर प्रकाश टाकला. शासनाच्या निर्देशानुसार दैनिकाचा छापील अंक प्रसिद्ध होत नसल्याच्या काळात, वाचकांना पीडीएफ स्वरूपात करोनाविषयीची इत्यंभूत सर्व योग्य माहिती पुरवण्याचे काम प्रभातने केले. त्यामुळे प्रभात लोकांसाठी खऱ्या अर्थाने आधारस्तंभ बनला.
श्री. वा. रा. कोठारी यांचे अग्रलेख म्हणजे जणू तोफखानाच
तलवारीने अनेक लढाया जिकंलेले जगज्जेतेही लेखणीपुढे नतमस्तक झाले, अशी लेखणीची किमया… ही लेखणी योग्य माणसाच्या हातात आल्यास समाजात क्रांती निर्माण झाल्याची उदाहरणे अनेक समाजसुधारक, लेखक, पत्रकार आणि संपादकांचे उदाहरणावरून स्पष्ट होते. असेच एक लेखणीधारी म्हणजे वा. रा. कोठारी. “अग्रलेख’ व त्यामधून मांडली जाणारी जनहिताची भूमिका ही त्यांची जमेची बाजू. एखाद्या विषयाला आपल्या अग्रलेखातून वाचा फोडण्यास कोठारी आघाडीवर होते. त्यांच्या “टोकदार लेखणीने’ अनेक लढाया जिंकल्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ते गोवा मुक्ती संग्रामातही त्यांची लेखणी तळपली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीदरम्यान त्यांनी अग्रलेखांतून “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!’ ही प्रखर भूमिका मांडली. मराठी माणसासाठीच त्यांनी आपली लेखणी झिजवली. त्याचे फळ मराठी माणसाला मिळाले. शेवटी 1 मे 1960 रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना झाली. कामगारांच्या हक्कासाठीही त्यांची लेखणी मागे राहिली नाही. अग्रलेखातून त्यांची लेखणी वस्तुस्थितीचे यथार्थ जिवंत चित्रच रेखाटलेले असायचे.
दहावी अभ्यास मालिकेचे प्रणेते कै. चंदुलाल गांधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 10 वीचा अभ्यास सुलभ व्हावा, यासाठी कै. चंदुलाल गांधी यांनी “दहावी अभ्यासमाला’ सुरु केली. या अभ्यासमालेमुळे “प्रभात’ला विद्यार्थ्यांच्या रूपातील नवा वाचकवर्ग लाभला. तर “प्रभात’च्या रूपात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहावीसाठी हक्काचा मार्गदर्शक लाभला. आजही “प्रभात’मध्ये विद्यार्थ्यांसाठी “दहावी अभ्यासमाला’ अव्याहतपणे सुरु आहे.
सिनेमा व नाटकांचा गाईड…
“प्रभात आणि चित्रपट’ हे समीकरण अनेक वर्षांपासून रूढ झालं आहे. चित्रपट व चित्रपटसृष्टीविषयीची खुसखुशीत माहिती, नव्या-जुन्या कलाकारांचा परिचय, छोट्या पडद्यावर कारकिर्द सुरु करुन मोठे झालेले तारे यांच्याबद्दल वाचकाला रंजक माहिती “प्रभात’मध्येच मिळते. चित्रपट हा तमाम भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनातून माणसाला स्वतःसाठी थोडीशी उसंत, थोडासा विरंगुळा हवा असतो. तो त्या सिनेमाच्या रूपाने मिळतो. नव्या काळाशी जुळवून घेत “प्रभात’नेही आपली शैली बदलत वाचकांना बदलत्या सिनेमाच्या झंझावातात मागे पडू दिले नाही. त्यासोबतच मराठी संस्कृतीचा गाभा म्हणजे नाट्यकला क्षेत्र. मराठी नाट्यक्षेत्र, रंगभूमीवर यशाच्या शिखरावर असलेल्यांना “प्रभात’च्या माध्यमातून मोठे व्यासपीठ मिळाले. नाट्य व इतर कलाक्षेत्रातील कलावंतांच्या सुखदु:खाला “प्रभात’च्या माध्यमातून वाचा फोडली.
सर्वांना समजून घेणारे दूरदृष्टीचे कै. अशोक गांधी
खिळे जुळणीची पद्धत मागे पडून कै. अशोक गांधी यांनी 1986-87 मध्ये दैनिकाचे कार्यालय संगणकीकृत केले. “प्रभात’ची पुढील 25 ते 30 वर्षांपर्यंतची पायवाट त्यांनी आखून दिली. सर्वप्रथम प्रभात रंगीत स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केला. “प्रभात’चे नवीन कार्यालयही त्यांनीच सुरू केले. “प्रभात’ची स्वीकारार्हता वाढविण्यात आणि “प्रभात’ सर्वसमावेशक करण्यात त्यांचा मोलाचा वाटा ठरला. आपल्या दूरदृष्टीतून त्यांनी “प्रभात’ला एक नवा आयाम आणि दिशा दिली. विश्वासार्हता, आपुलकी आणि स्नेहाचा एक वेगळाच आलेख त्यांनी रेखाटला. प्रभातचे सर्व कर्मचारी, जाहिरात एजन्सीज, विक्रेते आणि वाचकवर्गाशी अगदी कौटुंबिक नाते जोडण्याचे मोलाचे कार्य अशोक गांधी यांनी केले.
कायदेतज्ज्ञांशी अनोखे नाते
न्यायव्यवस्था समाजात समानता राखते. या न्याय प्रक्रियेतील कायद्याच्या बळावर अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देणारे कायदेतज्ज्ञ, विधिज्ञ म्हणजेच वकील. या वर्गाशी “दै. प्रभात’चा विशेष ऋणानुबंध अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे. विश्वसनीय वृत्त, जाहीर नोटिशींना मिळणारा चांगला प्रतिसाद, विविधता, आकर्षक पुरवण्या यामुळे प्रभात सर्वसामान्यांबरोबरच वकील वर्गातही रूजला आहे. “प्रभात’चा वाचक वर्ग शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जाहीर नोटिस “दै. प्रभात’मध्येच देण्याला प्राधान्य दिले जाते.
सर्वार्थाने प्रगती श्री. आनंद गांधी
“प्रभात’चे कार्यकारी संचालक आनंद गांधी यांच्या व्यवस्थापनाखाली “प्रभात’ने सर्वार्थाने मोठी प्रगती केली आहे. कालसुसंगत बदल घडवित खऱ्या अर्थाने कात टाकली. आजही नवनवीन प्रयोग करीत “प्रभात’ बदलत्या गरजेनुसार नवे रूप धारण करीत आहे. सध्या “प्रभात प्रेस’ अत्याधुनिक उपकरणांनी अद्ययावत आहे. पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली प्रभात कार्यालयाची इमारत आपल्या कार्याचा गौरव बाळगत ताठ मानेने उभी आहे. श्री. आनंद गांधी यांनी “प्रभात’ची तांत्रिक आणि वैचारिक श्रीमंती वाढवली. मात्र हे करत असताना पूर्वसूरींनी आखून दिलेल्या तत्वांना, विचारधारेला किंचितही तडा जाणार नाही, याबाबतची सजगता राखली आहे.
दैनिकाच्या वाटचालीत 90 वर्षांचा काळ हा लहान नसतो. अनेक साम्राज्येही एवढ्या काळात लयास गेल्याचा इतिहास आहे. मात्र आपल्या पायावर आणि जनतेच्या विश्वासावर आजही ठामपणे उभा राहिलेला “प्रभात’ ही या संवर्धक आणि मार्गदर्शकांचीच पुण्याई आणि दृढ इच्छाशक्ती, चांगले ते स्वीकारावे, वाईट ते सोडून द्यावे. मात्र त्याचवेळी चुकते ते खुपते या न्यायाने चुकीच्या बाबींविरोधात सर्व शक्तीनिशी आवाजही उठवावा या श्री. आनंद गांधी यांच्या विचारांनी आज “प्रभात’ची वाटचाल सुरू आहे.