शिक्रापूर – महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. अनेक ठिकाणच्या वेगवेगळ्या गावातील करोना आणि लॉकडाऊन काळामध्ये गायब असलेले स्वयंघोषित नेते यांची सोशल मीडियावर गर्दी दिसू लागली आहे. अनेक दिवसांपासूनचे गायब चेहरे निवडणुकीच्या निमित्ताने का होईना दिसून येऊ लागले आहे.
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असल्याने अनेक हौशी उमेदवार आणि स्वयंघोषित नेत्यांनी सोशल मीडियावर आपणच उमेदवार असल्याचे सांगत प्रचारास देखील सुरूवात केली आहे. ग्रामीण भागातील अनेकांनी आपापल्या वॉर्डात लक्ष देताना आपल्या स्थानिक नेत्यांचे फोटो टाकून “ध्यास परिवर्तनाचा गावच्या विकासाचा’, “चला परिवर्तनाचे शिलेदार बनू’, “स्मार्ट गावचे स्वप्न पूर्ण करू’, “आता चाहूल बदलाची’, “प्रारंभ युवा पर्वाचा’, “लक्ष ग्रामपंचायत 2021′, “माझा उमेदवार माझा अभिमान’, “जनतेच्या मनातील उमेदवार’, “नवा चेहरा नवी आशा’ यांसह आदि वाक्य टाकलेले फोटो, जाहिराती बनवून सोशल मीडियावर प्रसारित करत आहेत; मात्र सध्या सोशल मीडियावर दिसणारे स्वयंघोषित नेते यापूर्वी कोठेही आढळून आले नाहीत.
तसेच नागरिकांच्या समस्या सुख, दुःख त्यांना माहित नाहीत, तसेच एवढा मोठ्या करोना काळाचा नागरिकांना सामना करावा लागला असताना कोणीही पुढे आले नाही आणि आता अचानकपणे सर्वजण नेते बनून पुढे येऊ लागले आहेत.
उमेदवारी तर जाहिर होऊ द्या
सध्या काही नागरिक गावातील अनेकांच्या घरी जाऊन आपण काय करणार, याबाबत नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तर काही ठिकाणी वीस वीस वर्षे ग्रामपंचायतमध्ये सत्ता उपभोगलेले व्यक्तीदेखील पुन्हा निवडणूक लढविण्याचे स्वप्न पाहत आहेत.
त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये नेमके आहे तरी काय? असा सवाल नागरिक आणि मतदारांना पडला आहे. अद्याप कोणत्याही व्यक्तींची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसून नेमके कोणाला उमेदवारी मिळणार हे माहिती नाही; परंतु पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
निवडणुकीनंतर जातात कोठे ?
निवडणूक काळात अचानकपणे सोशल मीडियावर गर्दी करणारे स्वयंघोषित नेते, पुढारी, उमेदवार फक्त निवडणुकीपुरते येतात आणि त्यांनतर गायब होतात, त्यामुळे निवडणुकीनंतर हे नेते जातात तरी कोठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.