नवी दिल्ली : दिल्लीत गुरुवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. भुकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घराबाहेर येत सुरक्षितेचे काही उपाय अवलंबले. मुख्य म्हणजे गुरुवारी फक्त दिल्ली एनसीआर भागच नव्हे, तर नोएडा, गाजियाबाद या भागांसह मणिपूर आणि राजस्थानमध्येही भूकंप जाणवल्याचे सांगण्यात आले आहे.
Earthquake tremors felt in parts of Delhi. pic.twitter.com/npGfEwuvaN
— ANI (@ANI) December 17, 2020
दिल्लीत सामान्यापेक्षा तापमान 7 डिग्रीपेक्षा खाली होते. हे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. अशा परिस्थितीत रात्री उशिरा झालेल्या भूकंपामुळे येथील लोकांच्या समस्याही वाढल्या आहेत. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दिल्ली एनसीआर भागात भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर आले. सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता कळू शकली नाही. पण, त्यानंतर हाती आलेल्या माहितीनुसार 4.2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप असल्याचं म्हटले गेले. भूकंपाचे केंद्र गुरुग्रामपासून 48 किलोमीटर दूर दक्षिण पश्चिम दिशेला असल्याचे सांगण्यात येत आहे.
राजस्थानमधील सीकरमध्येही गुरुवारी सायंकाळच्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार य भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल असल्याचे सांगण्यात आले. यासंबंधीच्या वृत्ताला भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या (MoES) राष्ट्रीय विज्ञान केंद्राने (NCS) नेही दुजोरा दिला.
नॅशनल सेंटर ऑफ सिस्म़ोलॉजीनुसार गुरुवरी रात्री मणिपूरनजीक असणाऱ्या Moirang मध्ये 3.2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आल्याची माहिती समोर येत आहे. या भूकंपाचे केंद्र Moirang मणिपूरपासून 38 किलोमीटर दक्षिणेकडे होते. भारतीय वेळेनुसार हा भूकंप रात्री 10.03 वाजता आला.