नगर -प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत हवामान आधारित फळ पीकविमा आंबिया बहार 2019-20 मध्ये जिल्ह्यातील 8 हजार 301 शेतकऱ्यांना फळबागेचा 34 कोटी 92 लाख 91 हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
हवामानावर आधारित पंतप्रधान फळपीक विमा योजनेत जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब, संत्रा, मोसंबी, केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेवून, प्रस्ताव सादर केले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीत मदतीचे पाठबळ शेतकऱ्यांना मिळावे, म्हणून हवामानावर आधारित पीकविमा योजनेची सुरूवात करण्यात आली. जिल्ह्यात सन 2019-2020 या वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या फळबागांना या विमा योजनेचे संरक्षण कवच मिळाले असल्याचे विखे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील 297 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याना 7 कोटी 30 लाख 6 हजार, 685 डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना 34 कोटी 87 लाख, 65 आंबा उत्पादकांना 2 लाख 90 हजार, 1 हजार 107 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना 1 कोटी 10 लाख, 130 मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना 4 लाख 45 हजार, 77 केळी उत्पादक शेतकऱ्यांना 14 लाख 70 हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे.
अकोले तालुक्यातील 263 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. त्यांना 92 लाख 21 हजार रुपये मंजूर झाले. जामखेड तालुक्यातील 82 शेतकऱ्यांनी या योजनेत प्रस्ताव सादर केले होते. त्यांना 4 लाख 86 हजार, तर कर्जत तालुक्यातील 367 शेतकऱ्यांना 2 कोटी 7 लाख, कोपरगाव तालुक्यातील 323 शेतकऱ्यांना 1 कोटी 13 लाख, नगर तालुका 258 शेतकऱ्यांना 1 कोटी 24 पान लाख, नेवासे 330 शेतकऱ्याना 2 कोटी 28 लाख, पारनेर 450 शेतकऱ्यांना 2 कोटी 22 लाख, पाथर्डी तालुक्यातील 2 हजार शेतकऱ्यांना 7 कोटी 49 लाख, राहाता तालुक्यातील 496 शेतकऱ्यांना 2 कोटी 41 लाख, राहुरी तालुक्यातील 294 शेतकऱ्यांना 1 कोटी 60 लाख, संगमनेर तालुक्यातील 1 हजार 509 शेतकऱ्यांना 6 कोटी 33 लाख, शेवगाव तालुक्यातील 333 शेतकऱ्यांना 1 कोटी 50 लाख, श्रीगोंदा तालुक्यातील 1 हजार 439 शेतकऱ्यांना 6 कोटी 44 लाख आणि श्रीरामपूर तालुक्यातील 146 शेतकऱ्यांना 75 लाख रुपयांच्या विमा रकमेस मंजुरी मिळाल्याने अडचणीत असलेल्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.