नवी दिल्ली – मागील वर्षी (2020) देशभरात रेल्वेमार्गांवर 8 हजार 733 जणांनी जीव गमावला, तर 805 जण जखमी झाले. लॉकडाऊनमुळे मागील वर्षी रेल्वे वाहतुकीत लक्षणीय कपात करण्यात आली होती. तसे असूनही रेल्वेमार्गांवरील मोठी जीवितहानी धक्कादायक आणि दुर्दैवी मानली जात आहे.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत जानेवारी ते डिसेंबर 2020 या कालावधीत रेल्वेमार्गांवर झालेल्या जीवितहानीची माहिती मागवण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत रेल्वे बोर्डाने राज्य पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आकडेवारी दिली.
त्यानुसार, आधीच्या चार वर्षांपेक्षा मागील वर्षी कमी मृत्यूसंख्येची नोंद झाली. देशात 2016 मध्ये रेल्वे मार्गांवर 14 हजार 32 लोक रेल्वेच्या धडकेत मृत्युमुखी पडले. पुढील तीन वर्षांत ती संख्या अनुक्रमे 12 हजार 838, 14 हजार 197 आणि 15 हजार 204 इतकी होती. मागील वर्षी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कमी ठरली असली तरी लॉकडाऊन आणि कमी वाहतूक या बाबींचा विचार करता ती मोठी मानली जात आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे माहिती देताना मागील वर्षी रेल्वे मार्गांवर मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये स्थलांतरित कामगारांची संख्या मोठी असल्याचे नमूद केले. देशव्यापी लॉकडाऊनमुळे प्रवासाच्या सुविधा नसल्याने घरवापसीसाठी आतूर बनलेल्या स्थलांतरित कामगारांनी प्रसंगी पायपीट केली. दोन ठिकाणांना जोडणाऱ्या रस्त्यांपेक्षा रेल्वे मार्गांचे अंतर कमी मानले जाते.
त्यामुळे रेल्वे मार्गांलगत चालण्याला स्थलांतरित कामगारांनी पसंती दिली. लॉकडाऊन नियमांच्या भंगाबद्दल पोलिसांना टाळण्यासाठीही त्यांनी रेल्वे मार्गांची निवड केली. पोहोचण्याचे ठिकाण चुकणार नाही आणि लॉकडाऊनमुळे रेल्वेही धावणार नाहीत, असाही त्यांचा समज असावा.
मागील वर्षातील बहुतांश मृत्यू अपघातांमुळे नव्हे; तर परवानगी नसतानाही रेल्वे मार्गांवरून चालण्याने झाले असल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शॉर्टकट म्हणून रेल्वे मार्गांचा वापर करू नये, रेल्वे रूळ ओलांडू नयेत, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.
मागील वर्षीच्या देशव्यापी लॉकडाऊनवेळी रेल्वेकडून केवळ मालवाहतूक सुरू होती. त्यानंतर मागील वर्षीच्या 1 मेपासून स्थलांतरित कामगारांसाठी श्रमिक विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या. रेल्वेची प्रवासी सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. त्यानंतर मागील वर्षाच्या अखेरीस 110 नियमित आणि सुमारे 1 हजार 100 विशेष रेल्वे धावू लागल्या. करोना संकट दाखल होण्याआधीचा विचार करता सध्या 70 टक्के रेल्वे सेवा सुरू आहे.