वाघोली (प्रतिनिधी) :- नागरिकांची दस्त नोंदणीसाठी धावपळ होत असून लॉकडाऊन पासून बंद असलेले वाघोली येथील दुय्यम निबंधक कार्यालय चालू करावे अशी मागणी ॲड.शरद बांदल यांनी निवेदनाद्वारे शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचेकडे केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. त्या दरम्यान वाघोली येथील दुय्यम निबंधक कार्यालय बंद करण्यात आले ते अद्यापही सुरु झाले नसल्यामुळे नागरिकांना दस्त नोंदणीसाठी पुणे शहरात जावे लागत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतला नागरिकांना पुणे शहरात जाऊन जोखीम पत्करावी लागत आहे. नागरिकांचा वेळ वाया जात असून मोठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे वाघोली येथील शासनाच्या नियमांचे पालन करून दुय्यम कार्यालय सुरु केल्यास दस्त नोंदणीसाठी नागरिकांची धावपळ होणार नाही व नागरिकांना कोरोना संसर्गापासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
बुधवार (दि. १ जून) रोजी ॲड. शरद बांदल यांनी शिरूर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्याची मागणी केली. आमदार पवार यांनी तात्काळ नोंदणी महानिरीक्षक यांना फोनद्वारे संपर्क करून कार्यालय सुरु करणेबाबत चर्चा करून सकारात्मक दाखवली. लवकरच दुय्यम निबंधक कार्यालय सुरु होणार असल्याचे ॲड. शरद बांदल यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष व संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे हवेली तालुकाध्यक्ष योगेश बाळासाहेब शितोळे, राजेंद्र वारघडे उपस्थित होते.