मुंबई – राज्यात गेल्या दोन दिवसांत करोनाच्या सुमारे 700 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे 350 आणि 354 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सलग दोन दिवस एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असून सुमारे सव्वा महिन्यात 2819 रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात 9 मार्चला पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर 25 मार्चला पहिल्यांदा पुणे येथील दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर दररोज राज्यात करोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. सोमवारी 4 मे रोजी पहिल्यांदाच 350 रुग्णांना, तर लगेच दुसऱ्या दिवशी 354 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या करोनाबाधित रुग्णांना घरी सोडले जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली.