नवी दिल्ली – केंद्र सरकारने कारमध्ये सहा एअर बॅग घालण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे छोट्या कारच्या उत्पादनावर परिणाम होईल. त्याचबरोबर रोजगार निर्मितीवर परिणाम होण्याची भीती आहे, असे मारुती सुझुकी इंडिया कंपनीने म्हटले आहे.
छोट्या कारच्या निर्मिती आणि विक्रीवर अगोदरच परिणाम झाला आहे. मात्र 6 एअर बॅग बंधनकारक केल्यानंतर या क्षेत्रावर आणखी परिणाम होऊ शकतो. छोट्या कार मध्यमवर्गीय लोक घेत असतात. मात्र हे लोक कारच्या किमतीबाबत संवेदनशील असतात.
जर 6 एअर बॅग छोट्या कार मध्ये टाकल्या तर या कारची किंमत वाढू शकते. अशा परिस्थितीमध्ये ग्राहक खरेदी लांबणीवर टाकू शकतात. गेल्या तीन वर्षापासून छोट्या कारच्या विक्रीवर परिणाम झाला असल्याचे या कंपनीने म्हटले आहे.
ज्या कारमधून आठ प्रवासी प्रवास करु शकतील आज अशा कारमध्ये सहा एअर बॅग घालण्याचे बंधन घालण्यात आलेले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ऑक्टोबर महिन्यापासून होणार आहे. मारुती -सुझुकी इंडिया कंपनीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी सांगितले की, उत्सर्जनासारख्या नियमामुळे आणि कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे अगोदरच कारच्या किमती वाढत असल्यामुळे कारची विक्री कमी झाली आहे.
छोट्या शहरातील कारची विक्री तर जास्तच थंडावली असल्याचे त्यांनी सांगितले. जर कारची विक्री कमी झाली तर त्याचा परिणाम फक्त कार कंपन्यावरच होत नाही तर चालक, देखबाल इत्यादी व्यवसायावर परिणाम होत असतो. सहा एअर बॅगचे बंधन घातल्यामुळे कारच्या किमती किती वाढतील असे विचारले असता त्यांनी सांगितले की कारच्या किमती 25 हजार रुपयापर्यंत वाढू शकतात. छोट्या ग्राहकासाठी ही रक्कम फार मोठी असते.
जगीाल अनेक देशांमध्ये असे बंधन नाही. एअर बॅगचे बंधन घातल्यानंतर कारची किंमत वाढू शकते. ते भारतातील ग्राहकांना परवडण्यासारखे नाही. त्यामुळे केंद्र सरकारने या निर्णयावर फेरविचार करण्याची गरज आहे. जे ग्राहक कार घेणार नाहीत, ते ग्राहक मोटरसायकल वापरतील. कार पेक्षा मोटरसायकलवर अपघात होण्याची शक्यता जास्त असते.