हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – ‘गाव तेथे एसटी’ हे ब्रीद वाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाची सेवा सेनगाव तालुक्यातील तब्बल 10 गावांना मिळालेलीच नाही. या गावातील नागरिक कित्येक वर्षांपासून एसटीची प्रतीक्षा करीत आहेत.
बॉम्बे परिवहन महामंडळाचे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात रूपांतर झाले. तेव्हापासून गावांमध्ये बससेवा पोहोचावी यासाठी महामंडळ प्रयत्नरत आहे. जेथे रेल्वे सेवा नाही, अशा सर्व गावांत प्रवासासाठी एसटीशिवाय पर्याय नाही. एसटीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक मोठ्या आशेने गावाच्या फाट्यावर एसटीच्या प्रतीक्षेत असतात. त्यामुळेच राज्य परिवहन महामंडळाने ‘गाव तेथे एसटी’ असे ब्रीद घेतले आहे.
गत ५० वर्षांच्या खडतर प्रवासात ‘गाव तेथे एसटी’ या ब्रीद वाक्याचे तीनतेरा वाजले आहेत. सेनगाव तालुक्यातील भंडारी, होलगिरा, खैरी घुमट, बोरखेडी तांडा, साखरा तांडा, बोरखेडी पिनगाळे, हिवरखेडा, धोतरा, खडकी, सोनसावंगि, बोरखेडी, या गावात अद्यापही बस सेवा नसलेल्या गावात एसटी यावी यासाठी गावकऱ्यांच्या वतीने अनेकदा निवेदने देण्यात आली आहे व लोकप्रतिनिधी देखिल वारंवार सांगून झाले मात्र याचा काही उपयोग नाही.
आता महाराष्ट्र सरकारने 75 वर्षावरील ग्रामस्थांना मोफत सेवा मिळत आहे आणि महिलांना अर्धे तिकीट केले आहे, मात्र यांचा काही उपयोगच नाही. गावात एसटी पोहोचत नसल्याने बालवृद्धांना दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करत फाटा गाठावा लागतो.
याचा फटका भावी पिढीला बसत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एवढे अंतर पायी चालत गेल्यावर शाळा गाठावी लागते. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जीव धोक्यात घालून प्रवास एसटी सेवा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना प्रवासासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.
खासगी वाहतूकदारांमध्ये स्पर्धा होते, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवले जातात. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. सेनगाव तालुक्यातील 10 गावे अशी आहेत की, जेथे आत्ता महामंडळची बस सेवा नाही आणि या दहा गावातील भंडारी पाटी पासून खडकी पर्यन्त रस्ता देखिल अतिशय खराब आहे त्यामुळे ग्रामस्थाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
हिंगोली आगराची भंडारी मार्गे धोनोरा बस चालु करण्यात यावे, बस चालु झाली तर एस .टी महामंडळाच्या सुविधांचा जनेतेला लाभ मिळेल. हिवरखेडा येथील ग्रामस्थांना सात किलोमीटरसाठी 20 रुपये तिकीट देऊन खाजगि वाहनाने साखरा येथे जावे लागते व तेथून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी गाड्या लागतात. त्यामुळे एस टी महामंडळाच्या वतीने तात्काळ बस सेवा चालु करावी, अशी मागणी या भागातील ग्रामस्थाकडून केली जात आहे.
“महाराष्ट्र प्रशासन एसटी महामंडळाच्या वतीने 75 वर्षावरील नागरिकांना मोफत तर महिलांना अर्ध्या तिकीटांत बस सेवा दिली आहे. मात्र आमच्या गावात एसटी येत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तात्काळ या भागात बस सेवा सुरू करावी.” – मीनाक्षी शरद निरगुडे (ग्रामपंचायत सदस्य, हिवरखेडा ता. सेनगाव जि. हिंगोली)